Prakash Ambedkar on Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ला (Pahalgam Terror Attack) झाला काय होईल? असं अनेकजण विचारतात. मात्र, काहीही होणार नाही. यापूर्वी देखील काहीच झालं नाही. हे सरकार देखील काहीच करणार नाही, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केले आहे. अकोले तालुक्यातील कोतूळ येथे आयोजित विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श भूमी सोहळ्यातून ते बोलत होते. 

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आजचा काळ खूप वाईट आहे. सगळेजण म्हणतात राजकारणी बिघडले आहेत. मात्र, आपण स्वतः बिघडलो की नाही हा विचार कोणी करत नाही. त्यामुळे एकमेकाला दोष देऊन चालणार नाही, अशी परिस्थिती आहे. जसा राजा तशी प्रजा, आता मतदार हा राजा झाला आहे. त्यामुळे तो जसा उमेदवार निवडून देईल, तसाच लोकप्रतिनिधी वागेल. 2055 पर्यंत तरुण पिढीची संख्या वाढणार आहे. त्यानंतर मात्र ती पिढी हळूहळू कमी होईल. त्यामुळे बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. आपण मिळवलेलं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी धर्म आणि जात हा वैयक्तिक प्रश्न असावा. मात्र, आज या देशात यालाच प्राधान्य दिलं जात आहे. यामुळे तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं जात आहे, असे त्यांनी म्हटले.  

सरकार काहीही करणार नाही

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, वाढलेली लोकसंख्या लक्षात घेता नव्याने मांडणी करण्याची गरज आहे. आतापर्यंत अनेक सत्तेत आले व गेले. मात्र सगळेजण पाट्या टाकण्याचं काम करतात. पहलगाम हल्ला झाला काय होईल? असं अनेकजण विचारतात. मात्र, काहीही होणार नाही. यापूर्वी देखील काहीच झालं नाही. हे सरकार देखील काहीच करणार नाही. एखादा त्रास देत असेल तर एकदा-दोनदा पाहिलं जातं. मात्र, सहनशक्ती संपल्यावर त्याला मारूनच टाकतो. त्यामुळे काहीही कारवाई करताना त्यासाठी विचार करावा लागतो. कितीही इच्छाशक्ती असली तरी गरज नसल्यामुळे हे सरकार काहीही करणार नाही, असे त्यांनी म्हटले. 

सत्तेत येण्याचा सोपा मार्ग म्हणजे...

जगातलं कॉर्पोरेट क्षेत्र हे आगामी काळात भारतासाठी धोका आहे. या समस्येला तोंड देण्याची व्यवस्था आपल्याकडे आज उपलब्ध नाही. मात्र आज सत्तेत येण्याचा सोपा मार्ग म्हणजे जाती-जातीत भांडण लावा आणि लोकांना भावनिक करा. एखादा उमेदवार पैसे वाटायला आला तर ते घ्यायचे. मात्र, आपला विवेक जागा ठेवून मतदान करायचं. काही गोष्टी बदलायच्या असेल तर आपल्यापासूनच बदलाव्या लागतील. त्यामुळे प्रत्येकाने आता आपल्यातील विवेक जागा केला पाहिजे. सरकार चुकीचं वागत असेल तर तो दोष त्यांचा नाही तो आपला आहे, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. 

आणखी वाचा 

Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांकडून मागे गोळीबार, महिला ओरडतेय; काश्मीरी मुलाने बाळाला वाचवलं, पहलगाममधील अंगावर काटा आणणारा VIDEO