मुंबई : धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीने (Rain) बळीराजेचं मोठं नुकसान झालं असून अनेक नद्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेतात पाणी शिरल्यानं हाती आलेल्या सोयाबिनसह अनेक पीकं पाण्यात गेली आहेत. तर, काहींच्या घरातही पाणी शिरलं आहे. एकीकडे घरात आणि डोळ्यात पाणी असताना दुसरीकडे नेतेमंडळीही बांधावर जाऊन शेतकऱ्यांचं दु:ख जवळून पाहत आहे. त्यातच, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje nimbalkar) हे चक्क कमरेपेक्षा जास्त वाहत्या पाण्यात स्वत: उतरल्याचं पाहायला मिळालं. एका पत्र्याच्या घरात अडकलेल्या आजी आणि तिच्या नातवासाठी एनडीआरएफ पथकासह खासदार महोदयांनी जीवाची बाजी लावली होती. ओमराजेंचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यातच, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) त्यांना फोन आला होता का, याचीही त्यांनी माहिती दिली.
धाराशिव जिल्ह्यातल वडनेर ता.परंडा येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात एकाच कुटुंबातील एक आजी, 2 वर्षाचा चिमुकला आणि इतर 2 व्यक्ती रात्री 2 वाजल्यापासून पूर्ण पाण्याने वेढलेल्या घरात अडकले होते. स्वतःच्या घरावर अन्न व पाण्यविणा मदतीच्या अपेक्षेने ते डोळे लावून बसले होते. त्यावेळी, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी NDRF जवांनाच्या मदतीने स्वतः या कार्यात सहभागी होऊन कुटुंबाला सुखरुपपणे बाहेर काढले. सोमवारी रात्री 8 वाजता एका श्वानसह संपूर्ण कुटुंब सुखरुप बाहेर आल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. या थरारक प्रसंगात खासदार ओमराजेंनी दाखवलेल्या माणूसकी आणि लोकप्रतिनिधींच्या कर्तव्यदक्षतेचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. मनसेचे बाळा नांदगावकर यांनी त्यांना राजकारणातील कोहिनूर म्हटलंय. तर, खासदार संजय राऊत यांनीही पाठ थोपटली आहे.
ओमराजे यांनी निंबाळकर हे एबीपी माझावर लाईव्ह होते, रात्रीच्या थरारक घटनेची आपबिती सांगत होते, सरकारकडून अपेक्षा आणि शेतकऱ्यांच्या समस्या मांडत होते. तेव्हाच, एबीपी माझावर त्यांनी मुख्यमंत्र्यांची लाईव्ह पत्रकार परिषदही पाहिली. दरम्यान, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा फोन आला होता का? असा सवाल ओम राजेनिंबाळकर यांना विचारण्यात आला होता. त्यावर, निश्चितच ताबतोडब मला उद्धवजींनी फोन केला होता, अशी माहितीही दिली.
ओमराजेंना उद्धव ठाकरेंचा फोन (uddhav Thackeray calling)
वडिलकीच्या नात्याने त्यांनी माझी काळजी करणं साहजिक आहे. मी साहेबांना सांगितलं की, साहेब आम्ही बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेले शिवसैनिक आहोत, जिथं सामान्य माणसाला अडचण पडेल तिथं आम्ही कशाचीही पर्वा न करता झोकून देऊन काम करू, आम्ही तेच केलंय. यापुढेही कितीही कठीण प्रसंग आला तरी, त्याप्रसंगासाठी तिथेच निर्णय घेऊन कृती करणं आवश्यक असते. माझ्या सद्सदविवेकबुद्धीला जे वाटलं ती कृती मी केली, असे ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले. तसेच, सामान्य माणसांची काळजी घ्या, शेतकऱ्यांना भरीव स्वरुपात मदतीसाठी कोणाशीही बोलण्यासाठी मी आहे, शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी उभी आहे, असेही उद्धवजींनी मला सांगितल्याचंही खासदार निंबाळकर यांनी म्हटलं.
बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणत कौतुक
बाळासाहेबांचा शिवसैनिक हे काय रसायन आहे याची प्रचिती आज धाराशिव जिल्ह्यात दिसून आली. धारशिव जिल्हातील वडनेर, तालुका परंडा येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात एकाच कुटुंबातील आजी, 2 वर्षांचा मुलगा व दोन व्यक्ती रात्रीपासून घराच्या छतावर अडकले होते. शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर ह्यांनी NDRF च्या जवान आणि गावकऱ्यांच्या मदतीने त्यांची सुखरूप सुटका केली, असे ट्विट शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन करण्यात आले आहे. त्यातूनही ओमराजेंचं कौतुक केलंय.