Laxman Hake on Ajit Pawar: महाराष्ट्र हा कोणाच्या बापाची जहागिरी नाही. हे राज्य अठरापगड जमाती आणि भटक्या-विमुक्तांचे आहे, हे दाखवून द्या, असे आवाहन ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केले. सरकार 10 टक्के मराठा समाजाला घाबरत असेल तर आपल्याकडे 50 ते 60 टक्के समाज आहे. त्यामुळे आता ओबीसी समाजाचे शोषण पुरे झाले. इथले सरकार, आमदार आणि खासदारांना आपण पळता भुई थोडी करु, असे वक्तव्य लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केले. ते रविवारी सोलापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी लक्ष्मण हाके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार अमोल मिटकरी यांच्यावर टीकास्त्र सोडले.
अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेऊ नये. शरद पवार यांचा वारसा सांगू नये. अजित पवार तुम्ही पोल्ट्रीवरचे कामगार शोभता. यूपीएससी झालेल्या अधिकाऱ्याला दम देणे शोभत नाही त्यांनी भाषा सुधारावी. जर ते होत नसेल तर यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेऊन नका. अजित पवार तुम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर वगैरे कळणार नाही, तुमची ती कुवत किंवा लायकी नाही. तुम्हाला कारखाना चालवण्याशिवाय दुसरं काय जमतं?, अशी खरमरीत टीका लक्ष्मण हाके यांनी केली.
अमोल मिटकरी नावाचा रॉकेल चोर आपण वरिष्ठ सभागृहात पाठवला. मिटकरी यांनी त्या सभागृहाचा अपमान केला आहे. अमोल मिटकरी तुम्ही कितीवेळा तोंडावर पडणार आहात? हा अमोल मिटकरी हा मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएट झाला आणि याला वरिष्ठ सभागृहात सदस्य केले आहे. यूपीएससीचा लॉंग फॉर्म तरी माहिती आहे का? अमोल मिटकरी हा कोणत्यातरी समाजाला टार्गेट करतो, हा नकलाकार आहे. अजितदादा तुम्हाला अमोल मिटकरी तोंड काळं करायला लावणार. तुम्ही या पाळलेल्या श्वानाला आवरा, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली.
Laxman Hake: गोपीचंद पडळकर हा गावगाड्यातील ओबीसींचा आवाज: लक्ष्मण हाके
गोपीचंद हा माझा सहकारी असून अठरापगड जातीचा आवाज आहे. गोपीचंद पडळकर यांना मंत्रीपद मिळायला हवे. माझा सहकारी बोलायला लागला की, आम्ही गावगाड्यातील ओबीसींचा आवाज बनू. आमदार, खासदार आपण बनवू आणि सत्तेत कोणाला बसवायचे ते ठरवू. कुठल्यातरी काहीतरी गोष्टीसाठी आपला आवाज दाबू नका व्यक्त व्हा बोला, असे आवाहन लक्ष्मण हाके यांनी केले. गोपीचंद पडळकर आपण अल्पसंख्यांक आहोत का? आपण 50% आहोत. गोपीचंदाला एकच सांगेन, सगळं फेकून द्या, शोषण बास झालं. इथले सरकार, आमदार, खासदार यांना पळता भुई थोडी करू, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले.
कुठल्याही सरकारला किंवा शासनाला एखाद्या व्यक्तीचे आडनाव लावू नये, असं आदेश देण्याचा अधिकार नाही. आडनाव झाकून जात व्यवस्था नष्ट होणार असेल तर तसे होत नाही. बाबासाहेबांनी सांगितले होते जात कधीच जाणार नाही. धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याशी मी सहमत आहे. आडनाव लपून जात लपत नसते, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले. छगन भुजबळ हे तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करणारे नाहीत. भुजबळ साहेब ताठ मानेने उभे राहतील तेव्हा महाराष्ट्राचे चित्र बदललेले असेल. आम्ही रस्त्यावरची लढाई लढतो तुम्ही कॅबिनेटमध्ये बसून उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना जबाबदारीची जाणीव करून द्या, असेही लक्ष्मण हाके यांनी म्हटले.