पुणे: लोकसभा निवडणुकीचे सहा टप्पे पार पडल्यानंतर भाजपला पुन्हा एकदा सत्तेत येण्याची चाहुल लागली आहे. त्यामुळे येत्या 10 जून रोजी दिल्लीत नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या शपथविधीचा पार पडू शकतो. त्यादृष्टीने भाजपच्या (BJP) वर्तुळात वरिष्ठ नेत्यांपासून ते सामान्य कार्यकर्त्यांनी तयारी सुरु केली आहे. ही कुजबूज सुरु असतानाच अजित पवार यांनी सोमवारी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे भाजपने मोदींचा पंतप्रधानपदाचा शपथविधी (Narendra Modi Oathtaking Ceremoney) 10 जूनला आयोजित करण्याचे ठरवले आहे, या दाव्याला आणखी बळकटी मिळाली आहे. अजितदादांनी (Ajit Pawar) येत्या 10 तारखेला दिल्लीत महत्त्वाची घडामोड घडू शकते, असे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सांगितले. ही महत्त्वाची घडामोड म्हणजे नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा शपथविधी असल्याचे सांगितले जात आहे. 


देशभरात एकूण सात टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यापैकी सहा टप्प्यांची मतदानाची आकडेवारी समोर आल्यानंतर प्रत्येक राजकीय पक्षाने आपल्या परीने किती जागा मिळणार, याचे अंदाज काढायला सुरुवात केली आहे. भाजपच्या गोटातही अंतर्गत सर्व्हे सुरु असून त्याआधारे आपण 300 जागांचा आकडा पार करु, याची चाहुल पक्षातील वरिष्ठांना लागली आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आपण सहा टप्प्यांमध्येच 300 जागांचा टप्पा पार केलाय, असे वक्तव्य केले होते. तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनीही भाजप 370 जागांचा आकडा ओलांडेल, असे म्हटले आहे. त्यामुळे भाजपला देशात पुन्हा आपली सत्ता येणार असा आत्मविश्वास असून त्यादृष्टीने 10 जूनला नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीचे आयोजन करण्यात आल्याची चर्चा आहे.


अजित पवार नेमकं काय म्हणाले?


अजित पवार यांनी यंदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या 25 व्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम दिल्लीत साजरा करण्याचे संकेत दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापनदिन 10 जूनला आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले की, आपण 10 जूनला आपला 25 वा वर्धापनदिन साजरा करत आहोत. राष्ट्रीय पक्ष म्हणून आपल्याला मान्यता मिळवायची आहे. आजच्या पक्ष प्रवेशामुळे आपल्याला बळ मिळालं आहे. पुढील अधिवेशन षणमुखानंद की दिल्लीत तालकठोरा मैदान येथे घ्यायचं याबाबत निर्णय लवकरच घेतला जाईल. कारण 10 जूनला काही वेगळा निर्णय झाला तर आपलं अधिवेशन मागेपुढे होऊ शकते. कार्यकर्त्यांनी ही गोष्ट ध्यानात ठेवावी, असे अजित पवार यांनी सांगितले.


अमित शाहांना 300 पारचा विश्वास


अमित शाहांनी देशात पुन्हा मोदी सरकार येण्याचे संकेत देताना म्हटले की, आम्ही अखेरचा टप्पा गाठण्याआधीच  आम्ही बहुमताचा आकडा गाठला आहे. आम्ही शेवटच्या टप्प्या अगोदर 300 ते 350 जागांच्या आसपास होतो. यामध्ये शेवटच्या टप्प्यातील जागांचा समावेश नाही.अखेरचा टप्पा पार होण्याअगोदरच भाजप सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत आहे. आम्ही 400 पार जाणार आहोत, असा दावा अमित शाह यांनी केला.


आणखी वाचा


...तरच शरद पवारांशी जुळवून घेऊ, निकालापूर्वी अजित पवार यांचं मोठं वक्तव्य !