IIT Mumbai Raj Thackeray: आयआयटी मुंबईच्या कार्यक्रमात केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञानमंत्री डॉ. जितेंद्र सिंह (Jitendra Singh) यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वादंग निर्माण झाला आहे. मला आयआयटी बॉम्बेचं (IIT Mumbai) नाव बदलून मुंबई केलं नाही, याचा आनंद आहे, असे जितेंद्र सिंह यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचा मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी समाचार घेतला आहे. जितेंद्र सिंग यांचं विधान हे सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे. मुंबई जी मराठी माणसाची होतीच , तिला महाराष्ट्रापासून पासून वेगळं करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेने उधळून लावला. आणि  आपली मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली. त्याबद्दलची गेली अनेक दशकं यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात केली आहे, अशी खरमरीत टीका राज ठाकरे यांनी केली आहे. 

Continues below advertisement

Raj Thackeray News: राज ठाकरेंनी नेमकं काय म्हटलं?

केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी मुंबईत आयआयटीच्या कार्यक्रमात बोलताना, 'आयआयटीच्या नावातील बॉम्बे तसंच ठेवलं त्याचं मुंबई केलं नाही, हे चांगलं झालं असं विधान केलं'. जितेंद्र सिंग यांचं विधान हे सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे असं स्पष्ट दिसतंय. आणि ही मानसिकता काय आहे ? तर मुंबई जी मराठी माणसाची होतीच , तिला महाराष्ट्रापासून पासून वेगळं करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेने उधळून लावला. आणि  आपली मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली. त्याबद्दलची गेली अनेक दशकं यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात केली आहे ! 

खरंतर जितेंद्र सिंग यांचा मुंबईशी काही संबंध नाही, ना महाराष्ट्राशी, ना गुजरातशी. ते येतात जम्मूमधून.. पण आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चाललं आहे ते ओळखून तसं बोलून शाबासकी मिळवणे हाच त्यांचा उद्देश आहे. 

Continues below advertisement

या निमित्ताने फक्त मुंबई नाही तर आता एमएमआर परिसरात राहणाऱ्या तमाम मराठी जनांना माझं आवाहन आहे की, आता तरी डोळे उघडा. यांना 'मुंबई' हे नाव खटकतं कारण हे नाव आपल्या मुंबा आईच्या म्हणजे मुंबईची जी मूळची देवी आहे तिच्या नावावरून हे नाव घेतलं आहे. त्या देवीची सगळी लेकरं म्हणजे इथे पिढ्यानपिढ्या राहणारी मराठी माणसं. तुम्ही आणि तुमचं शहर यांना खुपतंय. 

आज केंद्र सरकारने तिकडे चंदिगढ शहर पंजाबच्या हातातून काढून घ्यायचा प्रयत्न केला. त्याला सर्वपक्षीय विरोध झाला म्हणून त्यांनी माघार घेतली, पण ती तात्कालिक माघार आहे. असाच काहीतरी डाव मुंबईच्या बाबतीत 100% शिजत असणार. 'मुंबई' नको 'बॉम्बे'च हवं यातून हळूच हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरु आहे. आधी मुंबई आणि मग संपूर्ण एमएमआर परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरु आहे. तेव्हा मराठी माणसा जागा हो. इथे आधीच केंद्रीय हस्तक उद्योगपती इत्यादींनी काय काय ताब्यात घ्यायला सुरु केलं आहे हे आपण रोज पाहतो आहोतच ! 

आतातरी मराठी माणसांना हे कळायला हवं ! 

राज ठाकरे ।

Jitendra Singh on IIT: जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले?

आयआयटीच्या नावात तुम्ही ‘बॉम्बे’ कायम ठेवले आणि त्याचे ‘मुंबई’ केले नाही, याबद्दल मी खूश आहे. आयआयटी मद्रासबद्दलही माझ्या याच भावना आहेत, असे वक्तव्य जितेंद्र सिंह यांनी एका कार्यक्रमात केले.

आणखी वाचा

आयआयटीच्या नावात ‘मुंबई’ नसल्याने मी खूश, केंद्रीय मंत्र्यांचं विधान, मनसेकडून जोरदार प्रहार; म्हणाले, आता बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाजवळ...