अहिल्यानगर : जिल्ह्यातील संगमनेर (Ahilyanagar) तालुक्यात विधानसभा निवडणुकांपासून राजकीय वातावरण तापलं आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच शिवसेना मुख्यनेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील जाहीर सभेत आमदार अमोल खताळ यांचं तोंड भरुन कौतुक केलं होतं. मात्र, त्याच संगमनेरचे शिवसेना आमदार अमोल खताळ (Amol Khatal) यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून कडक पोलीस बंदोबस्त तैनात आहे. हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, शहरात काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्यावर एका सार्वजनिक कार्यक्रमात हल्ला करण्यात आला, सर्वांसमक्ष त्यांच्या कानशिलात लगावण्यात आल्याने शिवसेना गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. शहरातील एका सार्वजनिक कार्यक्रमात हा हल्ला झाल्याची माहिती असून हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात आहे. हल्ल्यानंतर आमदार खताळ यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. तर, अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या हल्ल्याचा निषेध नोंदवत पोलिसांनी तात्काळ आरोपीच्या मागील मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, राजकीय भाष्य करत काही लोकांना ठोकशाही मान्य असेल तर महायुतीचे कार्यकर्ते त्याच भाषेत उत्तर देतील, अशा शब्दात इशाराही दिला.
हल्लेखोर कुणाचे पुरस्कृत?
आमदार अमोल खताळ यांच्यावरील या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो. हे हल्लेखोर कुणाचे पुरस्कृत आहेत का? याची माहिती घेऊन यासंदर्भात चौकशीचे आदेश पोलिसांना दिले आहेत. भ्याड करून महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास कमी होईल असा काहींचा गैरसमज आहे, हा गैरसमज दूर करायला वेळ लागणार नाही, असे म्हणत राजकीय विरोधकांना इशाराही विखे पाटील यांनी दिला. तर, दोषींवर तात्काळ कारवाईचे आदेशही दिल्याचं त्यांनी म्हटलं. काही लोकांनी लोकशाहीचा कौल मान्य केला पाहिजे, त्यांना लोकशाही मान्य नसेल आणि ठोकशाही मान्य असेल तर संगमनेर तालुक्यातील कार्यकर्ते त्याच भाषेत उत्तर देतील, असेही विखे पाटील यांनी म्हटले.
हेही वाचा
शॉकिंग! भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस ठेऊन नवऱ्यानेच बायकोला संपवलं; हत्याकांडाने मराठवाडा हादरला