Girish Mahajan : कंत्राटी भरतीच्या नावाखाली अडीच हजार कोटींचा भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला होता. त्यांच्या या टीकेला राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन (Girish Mahajan) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आता विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळं विरोधकांच्या पोटात गोळा आल्याचे महाजन म्हणाले. 


शासनाने लोकाभिमुख योजना आणल्या 


रोहित पवार यांनी अडीच हजार कोटींच्या भ्रष्टाचारावर केलेल्या आरोपांवर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळं विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. मात्र, शासनाने लोकाभिमुख योजना आणल्या आहेत. यामध्ये महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी योजना आहेत. त्यामुळे विरोधकांच्या पोटात गोळा आला असून त्यामुळे असे आरोप प्रत्यारोप रोज करत असल्याचे महाजन म्हणाले.  


येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लोकांचा कुणावर विश्वास आहे हे लवकरच दिसेल 


ठाकरे सरकार सत्तेत असताना त्यांनी काहीही केले नाही. कुठल्याही योजना आणल्या नाहीत, ते सुस्त पडून होते. तसेच मराठा आरक्षणासंदर्भात कधी दिल्लीत चर्चाही केली नाही असे महाजन म्हणाले. मात्र, फडणवीस यांनी दिलेले आरक्षण सुप्रीम कोर्टाने फेटाळले होते. मात्र, त्यावेळेसची उदासीनता ही ठाकरे सरकारची होती असेही ते म्हणाले. लोकांचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लोकांचा कुणावर विश्वास आहे हे लवकरच दिसेल असे महाजन म्हणाले.