MIM Lok Sabha Election 2024 : छत्रपती संभाजीनगर : एमआयएमचं (MIM) लोकसभा निवडणुकीचं (Lok Sabha Election 2024) ठरलं आहे. एमआयएम महाराष्ट्र (MIM Maharashtra) 6 जागा लढवणार आहे. यात मराठवाडा (Marathwada) 2, (संभाजीनगर , नांदेड) विदर्भ (Vidarbha) 2, मुंबई (Mumbai) 1 आणि उत्तर महाराष्ट्रातील (North Maharashtra) 1 अशा जागा असतील. सगळ्या पक्षांचं जागावाटप जाहीर झाल्यानंतरच एमआयएम आपल्या पत्ता ओपन करेल, अशी प्रतिक्रिया खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी दिली आहे. आपल्यासाठी छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईचे (Mumbai Lok Sabha Election 2024) पर्याय खुले असल्याचंही जलील यांनी म्हटलं आहे.     

  


खासदार इम्तियाज जलील यांची 'एबीपी माझा'ला एक्स्लुझिव्ह माहिती दिली. त्यावेळी ते म्हणाले की, "महाराष्ट्राबाबत आतापर्यंत 6 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. यापेक्षा जास्त जागाही असू शकतात. कारण दररोज राज्याच्या राजकारणात अनेक घडामोड घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. जेव्हा सर्व पक्षांच्या याद्या जाहीर होतील, तेव्हा कुठे ना कुठे नाराजीचा सूर पाहायला नक्कीच मिळेल. बघू आता इतर पक्ष जसजसे आपले पत्ते उघडतील, त्यानंतर आम्ही आमचे पत्त ओपन करू." लोकसभा निवडणूक लढण्याबाबत विचारल्यावर ते म्हणाले की, "इम्तियाज जलील यांना दोन पर्याय आहेत. एक मुंबईतील जागा, दुसरी म्हणजे, छत्रपती संभाजीनगरमधील जागा".                                     


एमआयएम लोकसभेच्या सहा जागा लढवणार आहे. त्यात मराठवाड्यातील दोन जागांचा समावेश आहे. त्यात छत्रपती संभाजीनगरमधील एक आणि नांदेडमधील एका जागेचा समावेश आहे. विदर्भातील एका मतदारसंघ अकोल्यातून एमआयएम लढणार असल्याची घोषणादेखील केली आहे. एक मात्र, एमआयएमकडून उत्तर महाराष्ट्र आणि मुंबईतील जागेबाबत मात्र सस्पेन्स ठेवण्यात आला आहे. एकंदरीत उत्तर महाराष्ट्रातील सध्याची स्थिती पाहिली तर, जळगावमधून एमआयएम आपल्या उमेदवार उभा करू शकतं. तिथे एमआयएमचे आमदारही आहेत. 


दरम्यान, आता एक मात्र स्पष्ट झालं आहे की, एमआयएम राज्यातील सहा जागांवर निवडणूक लढवणार आहे. मात्र, एमआयएमकडून अद्याप उमेदवारांबाबत माहिती देण्यात आलेली नाही. त्याबाबत बोलताना इम्तियाज जलील यांनी आधी सर्व पक्षांचे उमेदवार घोषित होऊ देत, त्यानंतर आम्ही आमचे पत्ते खोलणार, असं म्हणाले आहेत. त्यामुळे आता एमआयएम उत्तर महाराष्ट्रातून आणि मुंबईतून कोणाला उमेदवारी देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.