जालना: मराठा आरक्षणाची लढाई निकराने सुरु ठेवणाऱ्या मनोज जरांगे यांच्यावर अजय महाराज बारसकर (Ajay Maharaj Baraskar) यांनी नुकतेच गंभीर आरोप केले होते. मनोज जरांगे हा खोटारडा व्यक्ती आहे, ते रोज पलटी मारतात. मराठा आंदोलन सुरु असताना जरांगे आणि राज्य सरकारमध्ये गुप्त बैठकी झाल्या होत्या, असे आरोप बारसकर यांनी केले होते. त्यांच्या या आरोपांना मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी प्रत्युत्तर देताना काही खळबळजनक दावे केले आहेत. अजय बारसकर हा महाराज वगैरे नाही. त्याच्या गावातील लोक बारसकर याने महिलांवर बलात्कार केल्याचे सांगतात. अशाच एका महिलेच्या विनयभंग प्रकरणात बारसकर अडकला होता. ते प्रकरण सरकारकडून दाबले गेले. तू जरांगेंविरोधात बोल नाहीतर तुझं प्रकरण उघड करु, अशी धमकी अजय बारसकर यांना देण्यात आल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले. ते गुरुवारी अंतरवाली सराटी येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.


अजय बारसकरला विकत घेतला आहे, तो एक सापळा आहे. अजय बारसकर बच्चू कडू यांच्यासोबत यायचा. ज्या माणसाला सोशल मीडियावरही काडीची किंमत नाही त्याच्यासोबत आज मुंबईतील चॅनल्स तास-तासभर बोलत आहेत. सरकारचा पाठिंबा असल्याशिवाय हे शक्य आहे का?, असा सवाल मनोज जरांगे यांनी विचारला. अजय बारसकरने अनेक भानगडी केल्या आहेत. त्याने एका संस्थानाच्या नावाखाली लोकांकडून ३०० कोटी जमा केले होते. दुसऱ्या गावात भिशीचे पैसे घेऊन तो पळाला होता. आता तो मरणार आहे. फक्त त्याला तुकाराम महाराजांचे नावाखाली सहानुभूती घेऊन मरायचे आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.


तुकाराम महाराजांबद्दल माझ्याकडून वाईट शब्द गेले असतील तर माफी मागेन: मनोज जरांगे


मी उपोषणाला बसलो होतो तेव्हा मी माझ्या तंद्रीत होतो. त्यावेळी माझी चिडचिड होत असताना मी काही बोलून गेलो असेन तर मी तुकाराम महाराजांसमोर नाक घासायला तयार आहे. मी आंदोलन संपल्यानंतर त्याबद्दल पश्चाताप व्यक्त करेन. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या चरणी लीन होण्यात काय अडचण आहे, असे जरांगे यांनी म्हटले.


मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा


अजर बारसकर याला एका दिवसात बोलण्यासाठी इतकी चॅनल्स उपलब्ध झाली. मी १९ वर्षे संघर्ष करतोय, मला कधी चॅनल्स मिळाली नाहीत आणि याला तास-तासभर चॅनेल्सवर बोलायला मिळते. सरकार, शिंदे साहेबांचा प्रवक्ता आणि बारसकरच्या पाठी जो कोणी बडा नेता आहे, त्यालाही मी सांगतोय, तुम्ही याला साथ दिली तर याच्यामुळे तुमच्या पक्षाचे वाटोळे होईल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.


३ मार्चला रास्ता रोको आंदोलन


मनोज जरांगे यांनी ३ मार्चला रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली आहे. २४ फेब्रुवारीपासून आपल्याला गावागावात रास्ता रोको करायचा आहे. पण ३ मार्चला आपल्याला सर्व जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी रास्ता रोको करायचा आहे. त्याची तयारी आतापासूनच करा. आपापल्या जिल्ह्यात ताकदीने हे आंदोलन करायचे आहे. ३ तारखेला असा रास्ता रोको झाला पाहिजे की, भारतात असा रास्ता रोको कधीच झाला नसेल, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.


आणखी वाचा


मनोज जरांगे खोटारडा माणूस, रोज पलटी मारतो, त्याच्या अनेक गुप्त बैठका, अजय महाराज बारसकरांचे गंभीर आरोप