Manoj Jarange Patil: अंतरवाली सराटी इथे पोलिसांकडून झालेली मारहाण ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सांगण्यावरूनच, असा थेट आरोप मराठा आरक्षणाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीसांना टार्गेट का?, असा प्रश्न मनोज जरांगे पाटीलांना विचारण्यात आला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले नसते तर पोलिसांची हिंमत नव्हती, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. एबीपी माझाशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
पहिल्या आरक्षण लढ्यात निघालेला जीआर योग्य, मात्र अंमलबजावणीत आमची फसवणूक झाली, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. चर्चेच्या प्रक्रियेत मी गेलो नाही, मुख्यमंत्र्यांचा माहीत नाही. मात्र चर्चा करायची नाही असे मी म्हटलो नाही. सरकारने मुंबईत येण्याची वेळ येऊ देऊ नये. एकदा मुंबईच्या दिशेने निघालो की मग माघार नाही, असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
आम्ही जातीवादी नाही- मनोज जरांगे पाटील
मराठा समाजाला राजकीय आरक्षणाची गरज आहे का?, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांना विचारण्यात आला. यावर याचा विचार त्यांनी करावा. आम्ही जातीवादी नाही. मंडल कमिशन न दिलेल्या आरक्षणावर आम्ही काहीही बोललो नाही. मग आमच्याच आरक्षणाला विरोध का?, असा प्रतिसवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.
अंतरवलीत झालेली चूक पुन्हा करू नका- मनोज जरांगे पाटील
अंतरवलीत झालेली चूक पुन्हा करू नका, तुम्ही जर काही भानगड करायला जाल तर त्याची किंमत तुमच्यासह पंतप्रधानांना देखील भोगावी लागेल. एकदा आमचे डोके फुटले, अजूनही आमच्या अंगातल्या गोळ्या निघाल्या नाहीत, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस तुम्ही मराठ्यांच्या नादी लागायचं नाही गोडी गुलाबी ना तुम्हाला जे करायचं ते करायचं, त्यावेळेस घडलं ते घडलं आता पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाही. ही धमकी नाही तुम्हाला मी हे समजून सांगतो, कारण तुम्हाला ती खोड आहे, असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटलांनी केला.
29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार-
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे. 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील हे मुंबई धडकणार आहे. हे आंदोलन निर्णायक ठरणार असून, मराठा समाजाच्या विजयाचा गुलाल उधळायचाच आहे, असा ठाम निर्धार मनोज जरांगेंनी केला आहे.