Maharashtra Assembly Monsoon Session 2025 : राज्यात काही काळापूर्वी मशिदींवरील भोंग्यांवरून मोठं राजकारण तापलं होतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सरकारला अल्टिमेटम देत मशिदीवरील भोंगे उतरवण्याची मागणी केली होती. याच मुद्द्यावर भाजप सत्ताधारी असलेल्या उत्तर प्रदेशातील योगी सरकारनेही ठोस पावले उचलून कारवाई केली होती. दरम्यान, मुंबई पोलिसांनी या प्रकरणी मोठी कारवाई करत शहरातील विविध धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवले आहेत. विशेष म्हणजे, या कारवाईमुळे मुंबई शहर भोंग्यांपासून पूर्णपणे मुक्त झालं आहे. हा मुद्दा आज विधानसभेत चांगलाच गाजला. भोंग्याच्या मुद्द्यावरुन ठाकरेंच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं कौतुक केलं. तर मंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांनी दहाच्या भोंग्याचं (संजय राऊत) काय? असा सवाल उपस्थित केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हसत खेळत उत्तर दिले आहे. 

Continues below advertisement

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 3367 धार्मिक स्थाळांवरील भोंगे काढले आहे. महाराष्ट्राने एसोपी केली आहे. ⁠मुंबई पोलिसांनी 1621 भोंगे हटवले आहेत. मी त्याचे अभिनंदन करतो. ⁠भोंगेमुक्त मुंबई करण्याचे काम पोलिसांनी केले आहे. त्यामुळे आता यासंदर्भात प्रश्न उपस्थित होणार नाही. ⁠कारण आता भोंगे नाहीत. ⁠जर असे भोंगे दिसले तर त्या परिसरातील पोलिस अधिकाऱ्यांची जबाबदारी असेल. या प्रकरणात ⁠जो दंड लावला जाईल त्यातला अर्धा दंड तक्रारदारांना दिला जाईल, असे त्यांनी म्हटले.

आदित्य ठाकरेंकडून फडणवीसांचं कौतुक

यानंतर भोंग्याच्या मुद्द्यावरुन ठाकरेंच्या युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. आदित्य ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करतो की, त्यांनी सगळ्यांशी चर्चा करून सगळे भोंगे काढलेले आहेत. मी मनापासून त्यांचे अभिनंदन करतो, त्यात काही दुमत नाही. पण, आता गणपतीचा सण येत आहे. नवरात्रीचा सण येत आहे. दहीहंडी देखील आहे. या काळात मिरवणुका निघतात. अनेकदा स्थानिक पोलीस स्टेशनमधून तिकडच्या मंडळांना परवानग्या असून देखील सतावले जाते. जर मंडळांकडे सर्व परवानगी असतील आणि जे पोलीस या मंडळांना सतावतील त्यांच्यावर कारवाई होणार का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

Continues below advertisement

मुख्यमंत्र्यांचं हसत खेळत उत्तर!

यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदित्य ठाकरे यांच्या सवालावर उत्तर देण्यासाठी सभागृहात उभे राहिले. त्यावेळी मंत्री अनिल पाटील यांनी म्हटले की, मुख्यमंत्री महोदय तुमच्याकडून इतकं चांगलं काम होतं. पण, त्या सकाळच्या दहाच्या भोंग्याची देखील माझी तक्रार आहे. याचा देखील तुम्ही विचार करा, असे त्यांनी म्हटले. अनिल पाटील यांनी असे म्हणतात सभागृहात एकच हशा पिकला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याचे हसत खेळत उत्तर दिले. ते म्हणाले की, त्यातला एकच प्रॉब्लेम आहे की, आता ध्वनी प्रदूषणाच्या विरोधात आपल्याकडे कायदा आहे. पण, विचाराच्या प्रदूषणाविरोधातला कायदा आपल्याकडे व्हायचा आहे. तो कायदा झाला की, त्याचा आपण विचार करू, असं त्यांनी म्हटले. 

आणखी वाचा

Laxman Hake on Ajit Pawar : अजितदादा पवार महाजातीयवादी, दरोडेखोर; लक्ष्मण हाकेंची जीभ पुन्हा घसरली; म्हणाले, तुम्ही नोटीसा पाठवणार असाल तर...