Maha Vikas Aghadi Seat Sharing: महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) गोटातून एक महत्वाची बातमी पुढे आली आहे. मविआत तिढा असलेल्या जागांची यादी  काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षातील हाय कमांडकडे पाठवली असल्याची माहिती पुढे आली आहे. तर काँग्रेस हायकमांडशी पक्षातील प्रमुख नेत्यांनी यासंदर्भात चर्चाही केली आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Elections 2024) प्रचारासाठी कमी वेळ असल्याने तिढा असलेल्या जागांचा विषय तातडीने संपवावा, अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाने मविआच्या उच्चपदस्थ नेत्यांकडे केली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार  वीस ते पंचवीस जागांवर मविआत तिढा  कायम असताना यामध्ये  विदर्भातील जागांवर सर्वाधिक तिढा असल्याची माहिती आहे. तर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये (Congress) अधिक जागांवर तिढा असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यातील जागावाटपाचा तिढा आता दिल्ली दरबारी गेला असून त्यावर नेमका काय पर्याय निघतो हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.





विदर्भातील काही जागांवर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस आग्रही 


 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे बिगुल वाजले आहे. महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत सध्या जागावाटपावर चर्चा सुरु आहेत. त्यातच महाविकास आघाडीत विदर्भातील जागांवर सर्वाधिक तिढा असून काँग्रेसने (Congress) यादी हायकमांडकडे पाठवल्याची माहिती समोर येत आहे. लोकसभेला अमरावती आणि रामटेक  हे दोन लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडल्याने  विधानसभेला विदर्भात  चार ते पाच अधिक जागा काँग्रेसने शिवसेना ठाकरे गटाला सोडाव्यात, अशी ठाकरे गटाची भूमिका आहे. त्यामुळे विदर्भातील अशा काही जागांवर  शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस हे दोन्ही आग्रही आहेत आणि या जागांवर निर्णय घेणे राज्यातील काँग्रेस नेत्यांना काहीसं कठीण झाल्याने, अशा जागांची यादी हायकमांडकडे काँग्रेसने पाठवली आहे.


 मी राहुल गांधी यांच्याशी सुद्धा आज बोलणार- संजय राऊत


दरम्यान, याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या विषयी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, मी राहुल गांधी यांच्याशी सुद्धा आज बोलणार आहेत. तिढा असलेल्या जागांवर लवकर मार्ग काढावा, असे आम्ही म्हणतोय. राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये जास्त मतभेद नाहीये. काँग्रेसचे राज्यातील नेते तिढा असलेल्या जागावर मार्ग काढण्यास सक्षम दिसत नाहीये. ते म्हणताय हायकमांडशी चर्चा करावी लागेल.  पण आता वेळ फार नाही, वेगाने चर्चा व्हावी. त्यामुळे आम्ही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितला आहे की, लवकर निर्णय घ्यावा आणि जागा वाटप जाहीर करावे, असे त्यांनी म्हटले. 


हे ही वाचा