Sanjay Raut on PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात वन नेशन वन इलेक्शनवर (One Nation One Election) भाष्य केले होते. त्यानंतर शुक्रवारी निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. 2019 साली हरियाणा आणि महाराष्ट्रात एकाच वेळी निवडणुका पार पडल्या होत्या. यंदा मात्र दोन्ही राज्यात वेगवेगळ्या निवडणुका पार पडणार आहे. महाराष्ट्रात दिवाळीआधी राज्यात निवडणुका पार पडतील असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र आता दिवाळीनंतर महाराष्ट्रातील निवडणुका पार पडतील, असे स्पष्ट संकेत निवडणूक आयोगानेच दिले आहेत, यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलाय.  


संजय राऊत म्हणाले की, नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून छाती पुढे करून सांगतात की, वन नेशन वन इलेक्शन. ते चार राज्यातल्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाहीत. झारखंड, हरियाणा, जम्मू काश्मीर, महाराष्ट्र या राज्याच्या निवडणुका जे सरकार एकत्र घेऊ शकत नाही ते वन नेशन वन इलेक्शनच्या वल्गना करत आहेत. खोटारडे कुठले, लोकांना मूर्ख बनवताय. महाराष्ट्रात आणि झारखंडमध्ये तुम्हाला हरण्याची भीती आहे. 


चार राज्यांची एकत्र निवडणूक घेण्याची फडणवीसांनी मागणी करावी 


त्यामुळे तुम्ही या दोन राज्यातल्या निवडणुका घ्यायला तयार नाहीत. तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचा अजून एक हप्ता महिलांना लाच म्हणून द्यायचा आहे. त्यामुळे तुम्ही निवडणूक घेत नाही. तुम्ही वन नेशन वन इलेक्शन म्हणत आहात मग सुरुवात करा. या चार राज्यांची एकत्र निवडणूक घ्या, देवेंद्र फडणवीस यांनी मागणी करावी. मोदी लाल किल्ल्यावरून खोटे बोलतात, अशी टीका त्यांनी यावेळी केली. 


फडणवीसांनी महाराष्ट्राचे महाभारत समजून घ्यावे


महाविकास आघाडी सत्तेत आल्यास सर्व कल्याणकारी योजना बंद करणार असून हे सावत्र भाऊ असल्याची टीका फडणवीस यांनी केली होती. यावरून संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ज्या पद्धतीने शेवटच्या काळात पुण्यात पेशव्यांचे राज्य सुरु होते त्याच पद्धतीने फडणवीस आणि त्यांचे लोक काम करत आहेत. हे तिघेही लोक घाशीराम कोतवाल आहेत. या तीनही घाशीराम कोतवालांच्या हातात महाराष्ट्र आहे. घाशीराम कोतवालांचा इतिहास काय हे आम्ही महाराष्ट्राला लवकरच सांगणार आहोत. लुटमार, खोटारडेपणा अराजक असा पेशव्यांचा आणि घाशीराम कोतवालांचा इतिहास होता. या महाराष्ट्राला आतापर्यंत शिवसेनेने तीन मुख्यमंत्री दिले. 70 वर्षापेक्षा जास्त काळात या महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री होऊन गेले आहेत. फडणवीस यांना राजकीय इतिहास माहीत नसेल त्यांनी या महाराष्ट्राचे महाभारत समजून घ्यावे. 


देवेंद्र फडणवीसांकडून सुडाचे राजकारण


महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सुडाचे राजकारण करत आहेत. त्यांचे राज्य जाईल, अशी त्यांना भीती वाटत आहे. ते हरत आहोत म्हणून त्यांना भीती वाटते. त्यामुळे ते लोकांना धमक्या देत आहेत. बाकी दोघांना विषयी बोलण्यात काहीच अर्थ नाही. देवेंद्र फडणवीस पडद्यामागून जे कपटकारस्थान करत आहे ते महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. चांगल्या योजना कधीही बंद केला जात नाही. या प्रकारची मानसिकता कोणत्याही सरकारचे नसते. नरेंद्र मोदी यांनी देखील काँग्रेसच्या योजनांची नावे बदलून त्या चालवल्या आहेत. नरेंद्र मोदींनी नवीन काहीही केलेले नाही. त्यांचे सरकार जाणार असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची झोप उडाली आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली. तसेच आमचे सरकार आल्यास आम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे तीन हजार रुपये करू, असेही संजय राऊत यांनी म्हटले. 


महाराष्ट्र तुम्हाला पुन्हा सत्ता देईल का? 


देवेंद्र फडणवीस यांनी आता आपला गाशा गुंडाळायला सुरुवात करावी. महाराष्ट्रातील जनता त्यांच्यावर कुठल्याही प्रकारे विश्वास ठेवायला तयार नाही. या प्रकारचे दळभद्री घाणेरडं राजकारण या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी सुरु केले आहे. आता त्याचा अंत जवळ आला आहे. महाराष्ट्राने मोदी आणि शाहांचे बहुमत गमावले आहे. महाराष्ट्र आता तुम्हाला पुन्हा सत्ता देईल का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. 


आणखी वाचा 


सरकारचं धाकधुक पाकपुक व्हायलंय; म्हणूनच दिल्लीतल्या पिताश्रीला सांगून निवडणूक पुढे ढकलली; अमोल कोल्हेंचे जहरी वार