मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाती निधनानंतर राज्यात घडामोडींना वेग आला, या घटनेनंतर अवघ्या दोन ते तीन दिवसातच दोन्ही गटांच्या एकत्रिकरणाबाबत चर्चा आणि बैठका झाल्याचे दावे पुढे येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये संभाव्य विलीनीकरणासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत काही बैठकाही झाल्याची माहिती आहे. या घडामोडींदरम्यान अजित पवार यांना भेटण्याआधी आदल्या दिवशी म्हणजेच २२ तारखेला शरद पवारांसोबत सिल्वर ओकवरती राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली असल्याची माहिती आहे. तर या भेटीबाबत आणि विलीनीकरणाबाबत जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी त्यांच्या आणि अजित पवारांच्या शेवटच्या भेटीत नेमकं काय घडलं, नेमकं काय बोलले याबाबत माहिती दिली आहे.
Jitendra Awhad: त्यांचं आणि माझं शेवटचं संभाषण झालं...
जितेंद्र आव्हाड म्हणाले, विलनीकरणाचा पुढाकार तर अजित पवारांनी घेतला होता. त्यांचं आणि माझं शेवटचं संभाषण झालं. हे मी आतापर्यंत बोललो नाही, तुम्हाला सांगतो या विषयावरती फार मला बोलायचं नाही. अजितदादा मला म्हणाले, जितेंद्र माझ्यावर विश्वास ठेव सगळं व्यवस्थित होईल, असंही त्यांनी आव्हाडांना म्हटल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
Jitendra Awhad: माझा बाप जो निर्णय घेईल तो माझा निर्णय असेल
मला या चर्चेतून लांब राहायचं आहे, त्यांना काय चर्चा करायची ते करू द्या. थर्ड ग्रेड कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये मला जायचं नाही. तो माणूस गेला आता त्यावर काय बोलू शकतो. तुम्ही स्पेसिफिकली विचारलं म्हणून मी तुम्हाला उत्तर दिलं. पण बाप जो निर्णय घेईल तो निर्णय आम्ही घेऊ, आपलं ठरलेलं आहे, बाप जो निर्णय घेईल ते करू. मी शांत बसलो आहे याची काही कारण आहेत. माझं ठरलं आहे, माझा बाप जो निर्णय घेईल तो माझा निर्णय असेल, असंही पुढे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
Jitendra Awhad: २२ तारखेला शरद पवारांसोबत सिल्वर ओकवरती राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक
अजित पवार यांना भेटण्याआधी आदल्या दिवशी म्हणजेच २२ तारखेला शरद पवारांसोबत सिल्व्हर ओकवरती राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत जयंत पाटील यांनी सर्व माहिती शरद पवारांना दिली. सिल्व्हर ओकवरुनच अजित पवारांना फोन करुन भेटण्यासाठी वेळ मागितली. त्यानुसार 23 तारखेला जयंत पाटील यांच्या घरी रात्री उशिरा भेटण्याचं सर्व नेत्यांनी ठरवलं. ९ वाजून ५५ मिनिटांनी जयंत पाटील यांच्या घरी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 14 नेते पोहोचले. साधारणता १० वाजता अजित पवार काळ्या रंगाची पॅंट आणि निळ्या रंगाचा शर्ट घालून साध्या कपड्यात जयंत पाटील यांच्या निवासस्थानी पोहचले. अजित पवार यांच्याकडून ते एकटेच होते तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून 14 नेते होते, अशी माहिती आहे.
शरद पवारांकडून सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन पाटील, अनिल देशमुख, अशोक पवार, राजेश टोपे यांचा सहभाग होता. कोणालाही संशय येऊ नये यासाठी सुरक्षा रक्षक बाजूला सोडून हे सर्व नेते वेगवेगळ्या गाड्यांमधून जयंत पाटलांच्या घरी पोहोचले. अजित पवार आणि या सर्व नेत्यांमध्ये साधारणत अडीच तास म्हणजेच रात्री साडेबारा वाजेपर्यंत बैठक सुरू होती. ज्या नेत्यांना विलनीकरणासाठी अडचण होती त्या नेत्यांनी जयंत पाटलांच्या घरी वन-टू-वन अजित पवारांसोबत बैठक केली. यामध्ये जितेंद्र आव्हाड, हर्षवर्धन पाटील, अनिल देशमुख आणि अशोक पवार यांनी वन टू वन अजित पवारयांच्या सोबत चर्चा केली. आपण जी चर्चा करतोय ही प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना समजली तर? असा प्रश्न शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उपस्थित केला. यावेळी पक्ष मी चालवतोय मी बघून घेईल असं उंच आवाजामध्ये अजित पवारांनी या नेत्यांना सांगितलं. या बैठकीत फायनल चर्चा होऊन हे सर्व नेते निघाले अशी माहिती सूत्रांच्या माध्यमातून समोर आली आहे.
