Girish Mahajan on Manoj Jarange Patil : सगेसोयरेच्या अंमलबजावणीवरुन भाजप नेते गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्यावरुन मराठा आंदोलक मनोज जरांगे गेल्या काही दिवसांपासून जोरदार टीका करताना दिसत आहेत.  मला डाव टाकुद्या, गिरीश महाजनला बेल्ट लावायला वेळ मिळणार नाही, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली होती. दरम्यान, गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)  यांना प्रत्युत्तर दिलं आहे. "मनोज जरांगे माझ्यावर का मलाच कळले नाही. मी फक्त म्हणालो होतो आरक्षण हे टिकणारे घ्यावे. आम्ही द्यायचे आणि कोर्टात ते टिकायचे नाही , मग समाजाची फसवणूक व्हायची हे टाळण्यासाठी मी बोललो होतो", असे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. 


शरद पवार यांनी कधी आरक्षणाचा अ काढला नाही किंवा आरक्षणावर ब्र देखील बोलले नाहीत


गिरीश महाजन म्हणाले, माझ्या बोलण्याचा त्यांना राग आलेला दिसतोय. मी जे बोललो ते वस्तुस्थितीला धरून बोललो होतो.  मीच पाचवेळा त्यांना जाऊन भेटलो. त्यांच्याशी बोलणी करीत होतो, पण एखादा शब्द एवढा धरुन ते माझ्यावरच टीका करीत आहेत, असा खुलासा गिरीश महाजन यांनी केला. 50 वर्षात शरद पवार यांनी कधी आरक्षणाचा अ काढला नाही किंवा आरक्षणावर कधी ब्र देखील बोलले नाहीत. याउलट आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊन उच्च न्यायालयात टिकवले पण ठाकरे यांच्या काळात ते गेले. आम्ही आरक्षण देऊन वाईट झालो. ज्या लोकांनी आरक्षणाची गरज काय समाजाला आरक्षणाची गरज नाही अशी वक्तव्ये केलीत, त्याचे रेकॉर्ड आहे आज तुम्ही त्यांचा बोलबाला करता. आरक्षण देणाऱ्यांवर टीका टिपण्णी करता, असंही गिरीश महाजन म्हणाले.


मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देताना ते कोर्टात टिकणारे असावे


पुढे बोलताना गिरीश महाजन म्हणाले, आजही मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देताना ते कोर्टात टिकणारे असावे, यासाठी एकनाथ शिंदे व फडणवीस प्रयत्न करीत आहेत.  सध्या जातीजाती आणि समाज समाजात ज्या पद्धतीचे वातावरण बनले आहे ते पुरोगामी महाराष्ट्राला परवडणारे नाही. यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे लागतील. यासाठीच भुजबळ पवार साहेबाना भेटले असतील. महायुतीत अजून जागांचे वाटप झाले नाही तर उमेदवाराची नावे कशी ठरतील असा सवालही महाजन यांनी केला. 


नाना पटोले यांना भावी मुख्यमंत्री लिहिलेली वीणा घातल्याचे त्यांच्या निदर्शनास आणताच मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे आहेत , संजय राऊत वेगळेच बोलत आहेत . काँग्रेस वेगळेच सांगत आहे , राष्ट्रवादीत वेगळेच सांगत आहेत आणि आपल्या ताई देखील आहेत. मग नेमके कोणाला भावी मुख्यमंत्री म्हणायचे असा टोलाही गिरीश महाजन यांनी लगावला.