मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानपरिषदेत भाषण केले. त्यावेळी, राज्यपालांनी महाराष्ट्राचे सुस्पष्ट चित्र मांडल्याचं त्यांनी म्हटलं. विक्रमी बहुमताने आम्ही निवडून आलोय, उद्योग बाहेर गेलेत यावर विरोधकांची कॅसेट अडकली आहे. मात्र, देवेंद्रजींच्या नेतृत्वात आमची दमदार सुरुवात झाली आहे. दुप्पट वेगाने आणि चौपट क्षमतेने आम्ही काम करतोय, आणखी जोमाने काम करायचं आहे. विकासकामे आणि कल्याणकारी योजना आपण राबवल्या आहेत. जनतेने याच कामावर आम्हाला विक्रमी बहुमत दिल्याचं सांगत एकनाथ शिंदे यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केलं. यावेळी, राज्यात महिलांवरील अत्याचार आणि महापुरुषांबद्दल सुरू असलेल्या वक्तव्यांवरुन होणाऱ्या संतापावरही एकनाथ शिंदेंनी विधानपरिषदेतून थेट इशारा दिला. सोलापूरकर, कोरटकर (Prashant Koratkar) कुणालाही सोडणार नाही, असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. 


भय्याजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्यावरुन राजकारण करण्यात आलं. कारण, त्यांनी आपल्या वक्तव्यावरुन स्पष्टीकरण दिलं आहे. तर, छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या अबू आझमींविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी मीच केली होती. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज या महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना सोडणार नाही. अबू आझम असो, प्रशांत कोरटकर किंवा राहुल सोलापूरकर यांना देखील सोडणार नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळातून थेट इशारा दिला आहे. त्यावेळी, इतर सदस्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली. तसेच, बीडमध्ये जे कौर्य झालं हे आपण पाहिलं, ही विकृती आपण ठेचून काढली पाहिजे, अशा लोकांना जेरबंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. बदलापूर, स्वारगेट घटना घडल्या, लाडक्या बहिणींवर नराधम अन्याय करत आहेत, त्यांना कुणालाही सोडलं जाणार नाही. बदलापूरला जि कारवाई झाली ती सर्वांनी पहिली होती, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी आरोपींना थेट इशाराच दिलाय. 


15 लाख कोटींची गुंतवणूक


विरोधक हे उद्योगांबद्दल बोलेले, पण हे करार कागदावर राहणारे नाहीत. गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रात परतीय गुंतवणूक देखील वाढली आहे. गेल्या दोनवेळा मी दोवासमध्ये साडे सात लाख कोटींचे करार केले आहेत, आणि आता 15 लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात करण्यात आलीय. सब्र का फल मिठा होता है. दीड ट्रीलियन गुंतवणूक फक्त एमएमआर रिजनमध्ये आहे, असेही एकनाथ शिंदेंनी सांगितले. 


पायाभूत सुविधांना गती


सिंचन प्रकल्पांन्ना आम्ही मान्यता दिली आहे. शेतकऱ्यांसाठी आम्ही त्यांच्यामागे उभे राहिलो. पायाभूत सुविधांसाठी 700 किलो मिटरचे रस्ते दोन टप्प्यात सुरू आहेत. विरोधकांनी मेट्रो, कारशेडला विरोध केला. पण, 15 ते 20 लाख लोकं मेट्रोने प्रवास करणार आहेत. मी मुख्यमंत्री असताना गिरणी कामगारांना 3-4 टप्प्यात 4 हजार घरं दिली. परवडणारी घरं... महिलांसाठी घरं... विद्यार्थी यांच्यासाठी हॉस्टेल हे सर्व गिरणी कामगारांसाठी सुरू आहे. मुंबईतील डब्बेवाल्यांसाठी देखील हे सगळं सुरू करत आहोत, अशी माहितीही एकनाथ शिंदे यांनी दिली. 


उद्धव ठाकरेंना टोला, शायराना अंदाज


एकनाथ शिंदेनी नाव न घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवरही टीका केली. 2019 ला सत्तेसाठी कोणी काय काय केलं सर्वांना माहीत आहे. वडिलांची छत्रछाया सोडून शत्रूशी हात मिळवणी केली. काही नेते टुरिस्ट म्हणून येतात आणि जातात, पायऱ्यांवर चॅनेलचा बूम बघून धूम ठोकतात, असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला. फितरत हमारी सहन करने की न होती, तो हिंमत आपकी बोलने की ना होती.. अशी शायरी देखील एकनाथ शिंदेंनी म्हटली. अडीच वर्षात आम्ही केलेली कामं लक्षात घ्या आणि पुढील पाच वर्षांचा अंदाज घ्या. शाबासकी नको पण बदनामी करू नका, असा टोला विरोधकांना लगावला. 



अंबदास दानवेंसाठी सूचक कोपरखळी


एकनाथ शिंदेंनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना उद्देशून म्हटले, तुम्ही इतके मुद्दे मांडलेत, तुमचं काय शेवटचं अधिवेशन आहे का? तुमच्या मित्रपक्षाने तुमच्या खुर्चीखाली बॉम्ब ठेवला असला तरी आम्ही आहोत ना तुमचे मित्र असे म्हणत एकप्रकारे सूचक कोपरखळीच मारली.


हेही वाचा