मुंबई : महायुतीच्या सरकारमध्ये एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या नेत्यांची भाषा आता थेट लंकादहन आणि अंहकारापर्यंत जाऊन पोहोचल्याचं दिसतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यातील सुप्त संघर्ष निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळतोय. या दोन्ही नेत्यांची भाषा आता थेट लंकादहन आणि अंहकारापर्यंत जाऊन पोहोचल्याचं दिसत आहे. अहंकाराविरोधात एकत्र आलोय आणि याच अहंकारामुळे रावणाची लंकी जळाली असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला होता. त्यावर आपण लंकेत राहत नाही, त्याकडे दुर्लक्ष करा असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी टोला लगावला.
पालघरमध्ये नगरपालिकेत भाजप विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत आहे. भाजपविरोधात या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेच्या पाठीशी इतर सर्व पक्ष एकवटले आहेत. त्यामुळे शिंदेसेना आणि भाजपमधील शाब्दिक वार आता अधिक तीव्र होताना दिसतंय.
BJP Vs Shivsena : अहंकार आणि रावणाची लंका
पालघरमधील सभेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी भाजपवर टीका केली होती. अहंकार तर रावणामध्येही होता. अहंकारामुळे रावणाची लंका जळून खाक झाली असं शिंदे म्हणाले होते. त्याला देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं. कुणी काय म्हणतंय त्याकडे लक्ष देऊ नका. आपण तर लंकेत राहत नाही, आपण रामाचे अनुयायी आहोत असं फडणवीस म्हणाले.
मंत्रिमंडळात एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या फडणवीस आणि शिंदेंमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं वारंवार दिसून आलं आहे. मंत्र्यांचे अधिकार, मिळणारा निधी असो किंवा फोडाफोडीचं राजकारण असो, या दोघांमध्ये सातत्यानं खटके उडाल्याचं पाहायला मिळत आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या तोंडावर फडणवीस आणि शिंदेंमधली खदखद पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.
Devendra Fadnavis Vs Eknath Shinde : भाजप-शिंदेंमधील वाद तीव्र
भाजप नेते आणि शिंदेंचे पारपंरिक शत्रू गणेश नाईक हे पालघरचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे शिंदेंच्या वक्तव्याला चांगलीच धार चढलेली पाहायला मिळाली. त्यामुळे फडणवीसांनीही चांगलाच वचपा काढल्याचं दिसून आलं. एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना गणेश नाईकांनी त्यांच्यावर टीका केली. दुसऱ्याला कमी लेखून मोठं होता येत नाही असं ते म्हणाले. तर भारतीय जनता पक्षाची ताकद जास्त असल्याने आपल्या विरोधात सर्व विरोधक एकवटले आहेत, मतदारांनी त्यांना उत्तर द्यावं असं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले.
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेवरुन श्रेयवाद
लंकादहनावरुन पडलेली ठिणगी आता लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादापर्यंत पोहोचली आहे. लाडकी बहीण योजना आपण मुख्यमंत्री असताना सुरू केली, त्यामुळे ही योजना बंद होणार नाही असा प्रचार शिंदे निवडणुकीत करताना दिसत आहे. तर देवाभाऊ असेपर्यंत लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी प्रचारावेळी दिलं.
विधानसभेत लाडकी बहीण योजनेनं महायुतीला मोठा हात दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे लाडका भाऊ होण्यासाठी सुरू असलेला हा संघर्ष नेमका कोणत्या टोकाला जाणार आणि बहिणी कोणत्या भावाच्या पारड्यात वजन टाकणार हे पाहावं लागेल.