Eknath Shinde on Sanjay Raut: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे आज (दि. 01 डिसेंबर) तब्बल एक महिन्यानंतर पुन्हा एकदा मैदानात उतरले. संजय राऊत यांनी एक महिन्यानंतर पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. अमित शाह (Amit Shah) शिंदे गटाचा कोथळा काढणार, शिंदे गटाचे 35 आमदार फुटणार, असा खळबळजनक दावा केला. आता यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हात जोडत अवघ्या तीन शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
Eknath Shinde on Sanjay Raut: नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, शिंदे यांची शिवसेना म्हणायला आम्ही तयार नाही. त्यांचा कोथळा अमित शाह काढणार हे लिहून घ्या. त्यांनी आमचा काढायचा प्रयत्न केला होता. शिंदेंचे 35 आमदार फुटणार. रवींद्र चव्हाण हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांची नेमणूक त्यासाठीच केली आहे, असे त्यांनी म्हटले. संजय राऊत यांच्या वक्तव्याबाबत एकनाथ शिंदे यांना विचारले असता त्यांनी हसत हसत हात जोडले आणि त्यांच्या तब्येतीला शुभेच्छा, अशी तीन शब्दांची प्रतिक्रिया दिली.
Eknath Shinde: आतापर्यंत कधीच अशा निवडणुका थांबवल्या गेल्या नाहीत
दरम्यान, राज्यातील 22 नगरपरिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या निर्णयावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतले आहेत. निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. कुठला कायदा निवडणूक आयोग काढतोय. ते मला माहित नाही, माझ्या अभ्यासानुसार निवडणुका पुढे ढकलता येत नाही. उद्या निवडणुका आणि आज निवडणुका पुढे ढकलतात हे खूप चुकीचं आहे. अनेक उमेदावारांची प्रचाराची मेहनत वाया गेली. निवडणूक आयोग स्वायत्त असलं तरीही अशाप्रकारे निर्णय घेणं चुकीचंच आहे, असे त्यांनी म्हटले. याबाबत विचारले असता एकनाथ शिंदे म्हणाले की, एकदा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली तर निवडणुका थांबवल्या जात नाहीत. मात्र, यावेळी थांबवल्या गेल्या. यावर पूर्ण माहिती घेऊनच मी बोलेल. मात्र, निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आतापर्यंत कधीच अशा निवडणुका थांबवल्या गेल्या नाहीत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
Eknath Shinde on Shahaji Bapu Patil: शहाजी बापू पाटलांच्या कार्यालयावर धाड, शिंदे म्हणाले...
सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयावर धाड पडली. LCB आणि निवडणूक आयोगाच्या पथवाकडून यावेळी रेकॉर्डिंग सुद्धा करण्यात आली. शहाजी बापूंच्या कार्यालयावर धाड पडल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत विचारले असता एकनाथ शिंदे म्हणाले की, जी काही चौकशी होत आहे, त्यामध्ये काही गांभीर्याने घेण्यासारखं नाही, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा