Eknath Shinde-Pratap Sarnaik Photo On Help Kit: मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे (Marathwada Rain) आलेल्या महाप्रलयामध्ये अनेक गावच्या गावं उद्ध्वस्त झाली आहेत. त्यांना मदतीचा हात देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्याकडून मदत केली जातेय. मात्र या मदतवाटपातही एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईकांकडून प्रचार करण्यात येत आहे. 

नुकसानग्रस्त नागरिकांना (Dharashiv Flood) देण्यात येणाऱ्या मदतीच्या कीटवर एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईकांचे फोटो छापण्यात (Eknath Shinde-Pratap Sarnaik Photo On Help Kit) आले आहेत. सरकारी मदतीऐवजी एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईकांकडून वैयक्तिक मदतीवर भर देण्यात आल्याचं दिसून येतंय. एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईकांच्या या प्रचारावरुन धाराशिवमधील ग्रामस्थ संतापल्याचे देखील दिसून आले. गेल्या तीन दिवसांपासून कोणीच आले नाही. आम्हाला तुमची मदत नको, तुमचा टेम्पो घेऊन जा...असा आक्रमक पवित्रा नागरिकांनी घेतला. तर काही नागरिकांनी आमचा संसार पाण्याखाली गेलाय, आम्हाला मदत घेऊ द्या...असं पवित्रा घेतला. 

शिवसेना पक्षाच्यावतीने मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना मदत- (Shivsena Shinde Group party in Dharashiv)

शिवसेना पक्षाच्यावतीने मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी तातडीने मदत पाठवण्यात आली. मदत घेऊन जाणाऱ्या वाहनांना शिवसेनेचे मुंबईतील कार्यालय बाळासाहेब भवन येथे भगवा झेंडा दाखविल्यानंतर हे ट्रक मदत साहित्य घेऊन धाराशिव जिल्ह्याकडे रवाना झाले. यात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाकडून पाठवण्यात येणारं डॉक्टरांचे पथक, जीवनावश्यक वस्तूंची किट्स, घरात लागणाऱ्या वस्तू आणि औषधांचा समावेश असेल. असे 50 ते 60 ट्रक अतिवृष्टीग्रस्त भागात पाठवण्यात येणार आहेत.

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले? (Chandrashekar Bawankule On Eknath Shinde)

मदतीच्या कीटवर एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईकांनी फोटो छापल्यामुळे विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. यावर आता भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी असे फोटो लावलेत आहेत, काय काय कशी मदत केली होती विरोधकांनी हे सर्वांना माहिती आहे. जाहिरातबाजी मदतीत येऊ नये.मला राजकारण आणायचं नाही. मतं मिळवण्याचा हा प्रसंग नाही. लोकांना आधार देण्याचे हे काम आहे. जाहिरातबाजी न करण्याची जबाबदारी आपली आहे.विरोधकांनी मात्र यासंदर्भात राजकारण केलंय.सरकारची जबाबदारी आहे मदत करणे, टोमणे मारण्यापेक्षा काय काय केलं पाहिजे हे सांगा..., असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 

संबंधित बातमी:

Marathwada Rain VIDEO : काय सांगावं, सगळंच मातीत गेलं; पुराचं पाणी अन् संसार मोडून पडला, म्हातारा बाबा धाय मोकलून रडला