Continues below advertisement

बीड : राज्याला हादरवणाऱ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) आरोपी वाल्मिक कराडची (Walmik Karad) माजी मंत्री धनंजय मुंडेंना आठवण आली. नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार करताना धनंजय मुंडे यांनी तसं वक्तव्यही केलं. आता त्याच वक्तव्यावरुन संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी मुंडेंवर टीका केली. चुकीची कामं बंद झाल्यामुळे आरोपी सहकाऱ्याची लोकप्रतिनिधींना उणीव भासते अशी टीका धनंजय देशमुखांनी (Dhananjay Deshmukh) केली.

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी हत्या करण्यात आली होती. या हत्येमागे खंडणीचे प्रकरण होते. धनंजय मुंडे यांचा जवळचा सहकारी वाल्मिक कराड आणि त्याच्या साथिदारांनी संतोष देशमुखांची क्रूर हत्या केली होती. या प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्याच्या साथिदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Continues below advertisement

Dhananjay Munde On Walmik Karad : काय म्हणाले होते धनंजय मुंडे?

राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत परळी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा भव्य कार्यकर्ता मेळावा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना धनंजय मुंडे यांनी एक वक्तव्य केलं. 'गेल्या 10 महिन्यांपासून बीडमध्ये जगमित्र कार्यालय सुरू आहे. पण आज इथे एक माणूस नाही' असं धनंजय मुंडे म्हणाले. यामुळे धनंजय मुंडे यांना उणीव भासत असलेला तो माणूस म्हणजे वाल्मिक कराड आहे अशी चर्चा सध्या बीडमध्ये रंगत आहे.

Dhananjay Deshmukh On Dhananjay Munde : चुकीची कामं बंद झाल्याने उणीव

धनंजय मुंडे यांनी केलेल्या या वक्तव्यावर संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी टीका केली. ते म्हणाले की, "एवढे दिवस ते अंग झटकत होते, या प्रकरणाचा आणि माझा काही संबंध नाही, हे प्रकरण मला माहीत नाही असं म्हणत होते. पण आताच्या त्यांच्या भूमिकेवरुन त्यांना सगळ्या गोष्टीची जाण असल्याचं स्पष्ट होतंय. ही गोष्ट जाणीवपूर्वक नाही तर गांभीर्यानं बोलली गेली आहे. त्यांचे ते सगळे सहकारी चुकीची कामं करायची, खंडणी गोळा करायचे. या सगळ्या चुकीच्या गोष्टींची स्पष्टोक्ती या लोकप्रतिनिधींनी दिली. ते यांच्या एवढे जवळचे आहेत की, चुकीची कामं करुनही त्यांना उणीव भासत आहे.

ज्यांनी पाप केलं त्यांना शिक्षा मिळणारच. एका निष्पाप माणसाला संपवलं यावर जास्त चर्चा न करता, एक आरोपी कसा गुंतला, त्याची उणीव कशी भासते याची त्यांना जास्त चिंता आहे असं धनंजय देशमुख म्हणाले.

Santosh Deshmukh Murder Case : वाल्मिक कराडची उणीव

दरम्यान, गेल्या वर्षभरात परळीची बदनामी झाली असून काय चुकलं, काय नाही हे न्यायालय ठरवेल असही धनंजय मुंडेंनी म्हटलं. वाल्मिक कराडचं नावं मुंडेंनी घेतलं नसलं तरीही नगरपरिषदेच्या निवडणुकीत धनंजय मुंडेंना कराडची उणीव भासत असल्याची जोरदार चर्चा आहे.

ही बातमी वाचा: