मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. शिवसेना (ठाकरे गट) आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) मनरेगाच्या मुद्द्यावर आक्रमक भाषण करत असताना भाजप आमदार देवयानी फरांदे (Devyani Farande) यांनी त्यांच्या भाषणात व्यत्यय आणल्याने सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फरांदे यांची चांगलीच कानउघडणी केली.
नेमका वाद काय?
सभागृहात भास्कर जाधव हे मनरेगा योजनेतील मजुरांच्या थकीत पगारावरून सरकारला धारेवर धरत होते. मजुरांचे पैसे चार-चार वर्षे का रोखले जातात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी 'जीरामजी' (GR) या शब्दाचा उल्लेख करत "तुम्ही लोकांचे जय श्रीराम करायचे ठरवले आहे का?" अशी मिश्किल टिप्पणी केली.
यावर सत्ताधारी बाकांवरील देवयानी फरांदे संतापल्या आणि त्यांनी पहिल्या बाकावर येऊन बसत भास्कर जाधव यांना "जय श्रीराम बोला" असा आग्रह धरला. त्यांनी जाधवांच्या भाषणात वारंवार हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला.
अध्यक्षांनी टोचले कान
देवयानी फरांदे पहिल्या रांगेत येऊन बसल्याने आणि तिथून गोंधळ घालत असल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना कडक शब्दात सुनावले. "फरांदे ताई, जागेवर जाऊन बसा. तुम्ही पहिल्या रांगेत येऊन बसलात म्हणजे तुम्हाला पहिल्या रांगेचे अधिकार मिळालेले नाहीत. तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन बसा," अशा शब्दात नार्वेकरांनी त्यांना फटकारले.
भास्कर जाधवांचा पलटवार
अध्यक्षांनी फरांदे यांना सुनावल्यानंतर भास्कर जाधवांनीही टोला लगावला. ते म्हणाले, "मॅडम, तुमच्याकडून शिक्षण घेण्याची माझी प्रज्ञा नाही. तुमची विद्वत्ता एवढी मोठी आहे की ती मला परवडणारी नाही". त्यानंतर मजुरांच्या प्रश्नावर सरकार उत्तर देत नसल्याचा आरोप करत विरोधी पक्षाने सभागृहातून वॉकआउट केले .
या गोंधळानंतर संबंधित मंत्र्यांनी स्पष्ट केले की, केंद्राकडून निधी प्राप्त झाला असून येत्या एका महिन्यात सर्व मजुरांची देणी पूर्ण केली जातील. सरकार मजुरांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असून विरोधक केवळ राजकारण करत असल्याचे त्यांनी सांगितले.
