Waqf Bill in Parliament Budget Session 2025: वक्फ (सुधारणा) विधेयक आज लोकसभेत मांडण्यात आलं आहे. या विधेयकावरून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. मोदी सरकारने विधेयकावर चर्चा करण्यासाठी आठ तासांची वेळ निश्चित केली. या प्रकरणी राज्यातील राजकीय वातावरण देखील चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं. वक्फ (सुधारणा) विधेयकाबाबत बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, वक्फ सुधारणा बील लोकसभेत मांडण्यात आलेलं आहे. हे बील पास होईल. भारतीय संविधानात सेक्युलर शब्दाचे पालन होणार आहे, असं विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. तर राऊतांच्या प्रश्नावर फडणवीसांनी माझ्या लेव्हलचे प्रश्न घेत चला, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे. 

नव्या बिलाने चुका सुधारण्याची संधी दिली आहे. महिलांना देखील प्रतिनिधित्व मिळालं आहे. अतिशय पुरोगामी असं पाऊल उचललं आहे. कुठल्याही धार्मिक आस्थांविरोधात हे नाही. काही चुकांचा फायदा घेत होते आणि जमीनी लाटत होते, या विधेयकाला सद्सदविवेकबुद्धी जागृत असलेला विरोध करणार नाही. विरोधक जेपीसीमध्ये निरुत्तर झालेत. सुधारणा राज्यांना घेऊन करण्यात आलेल्या आहेत. जेव्हा असं वाटतं विरोधकांनी छातीवर हात ठेवत निर्णय केला तर त्यांचा पाठिंबाच असेल. मात्र मतांच्या लांगूल चालनासाठी विरोधक हे करत आहेत, कोर्टात जाण्याची देखील मुभा यात नव्हती. मतांचे तळवे चाटण्याचे हे विरोधकांचे राजकारण आहे. ज्यांची सततविवेकबुद्धी जीवंत असेल उबाठा संदर्भात बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालण्याची अजूनही इच्छा असेल ते समर्थन देतील, असंही पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत राऊत यांच्या संदर्भातील प्रश्नावरती कोण संजय राऊत? माझ्या लेव्हलचे प्रश्न घेत चला, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे. 

राऊतांची प्रतिक्रिया काय?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार संजय राऊत यांच्यात शाब्दिक चकमक सुरु झाली आहे. काल मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या ट्विटनंतर राऊत यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये. भाजपला मिशा फुटल्या नव्हत्या तेव्हापासून शिवसेना हिंदुत्वाच्या मिशांना पिळ देत फिरतोय, अशा शब्दात राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला.

‘वक्फ विधेयकाचा आणि हिंदुत्वाचा काहीही संबंध नाही. वक्फ बोर्डामध्ये सरकार काही सुधारणा करू इच्छित आहे. पण त्या सुधारणांना फक्त मुसलमानांचाच विरोध आहे असे नाही, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही पूर्ण पाठिंबा नाही. भाजपने महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर तोडण्यासंदर्भात जी भूमिका घेतली होती, त्याला संघाने विरोध केला होता. याची गरज नाही, उगाचच वातावरण खराब करू नका, अशी भूमिका संघाने घेतली आणि वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयकाबाबतही संघाची भूमिका त्याच पद्धतीची आहे’, असे राऊत म्हणालेत.