Devendra Fadnavis : पहाटेच्या शपथविधीवरून अलीकडे दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. पहाटेच्या शपथविधीमुळेच राज्यातील राष्ट्रपती राजवट (President Rule ) उठली असल्याचं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं होतं. यावरूनच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुन्हा एकदा एक सूचक वक्तव्य केलं आहे. मी काही बोललो तरी समोरून दुसरी गोष्ट बोलली जाते. हळूहळू सगळ्या गोष्टी बाहेर आणणार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.  

  


पहाटेच्या शपथविधीवर बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले आहेत की, हळूहळू गौप्यस्फोट होत आहेत. तसेच मी जे बोलो तेच कसं खरं होत आहे, हे हळूहळू समजेल. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भाजप-राष्ट्रवादीच्या युतीबद्दलच्या वक्तव्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की,  तुम्हाला अर्धी माहिती मिळाली आहे, मी काही बोलतो त्यावर समोरून दुसरी गोष्ट समोर येते. आता हळुहळू सगळ्या गोष्टी बाहेर येतील."


Devendra Fadnavis On Uddhav Thackeray - Aditya Thackeray : 'उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे शत्रू नाहीत'


ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले होते की देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आमचे मित्रच आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, ''महाराष्ट्रात एक संस्कृती आहे, ज्यात फक्त वैचारिक विरोधक असतात. अलीकडच्या काळात आपल्या शत्रुत्व पाहायला मिळत आहे. मात्र ते योग्य नाही, हे कधीतरी संपवायला लागेल. यामुळे मला जेव्हा-जेव्हा मुलाखतीत विचारलं तेव्हा मी सांगितलं आहे, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)  हे माझे शत्रू नाही, आम्ही वैचारिक विरोधक आहोत.''


काय म्हणाले होते शरद पवार? 


दरम्यान, पहाटेच्या शपथविधीवर चिंचवडमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले होते की, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी घेतलेल्या शपथविधीनंतर राष्ट्रपती राजवट उठली. जर राष्ट्रपती राजवट उठली (President rule) नसती तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री झाले असते का? तुम्हाला पहाटेच्या शपथविधीबाबत माहीत होते का? असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी शरद पवारांना विचारला होता. त्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, असं काही घडलं नसतं तर राष्ट्रपती राजवट उठली असती का?