मुंबई: लोकसभा निवडणुकीमध्ये (Maharashtra Loksabha Election2024) महाराष्ट्रात महायुतीचा पराभव झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पक्षसंघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस यांच्या या घोषणेने भाजपसह (BJP) महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. मात्र देवेंद्र फडणवीसांची ही मागणी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह यांनी अमान्य केली आहे.


नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाल्यानंतर आपण महाराष्ट्राबाबत सविस्तर चर्चा करुन निर्णय करु. महाराष्ट्रात काय करेक्टिव्ह उपाययोजना केल्या पाहिजेत, याचा आराखडा तयार करू. पण, तोवर तुम्ही आपले काम सुरू ठेवा, असा सल्ला अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीसांना दिला. देवेंद्र फडणवीसांनी आज मुंबईत भाजपच्या सर्व आमदारांशी संवाद साधला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती सर्व आमदारांनी केली बैठकीत केली.  


देवेंद्र फडणवीस आज भाषण करत असताना काय घडलं?


लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची इच्छा जाहीर व्यक्त केली होती. आज झालेल्या भाजप आमदारांच्या बैठकीत फडणवीसांनी भूमिका मागे घ्यावी आणि सरकारमध्ये राहून संघटना वाढवण्यातही काम करावे असा प्रस्ताव मांडण्यात आला. जेव्हा फडणवीस भाषण करत होते, त्यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाषणात त्यांना टोकत म्हणाले, 'भाषण करा, पण आम्ही जो प्रस्ताव मांडला आहे त्यावर आधी उत्तर द्या, तेव्हा फडणवीस म्हणाले थांबा जरा थांबा... योग्य वेळी योग्य गोष्टी करु' असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी सरकारमधून मुक्त होण्याच्या आपल्या निर्णयासंदर्भात सूचक वक्तव्य करत बोलणं टाळलं.


महाराष्ट्रातून उद्योग पळवले हा नरेटिव्ह खोटा- देवेंद्र फडणवीस


महाविकास आघाडीकडून सातत्याने महाराष्ट्रातून उद्योग बाहेर जात आहेत, असा नरेटिव्ह सातत्याने मांडण्यात आला. उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्रात गुंतवणुकीत खाली होता, गुजरात, कर्नाटक ही दोन राज्यं पुढे होती. यावर्षी अशी परिस्थिती अशी आहे की, गुजरात, कर्नाटक दिल्ली यांची एकत्रित बेरीज केली तर त्यापेक्षा जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. आता गुजरात आमच्याशी स्पर्धा करु शकत नाही. असं असताना रोज खोटं नरेटिव्ह, उद्योग पळवले बोलायचे. उद्योग पळाले असते तर एवढी गुंतवणूक महाराष्ट्रात कशी आली असती, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.


मराठी माणूस त्यांच्यासोबत गेला नाही- देवेंद्र फडणवीस


उद्धव ठाकरेंना फार सहानुभूती आहे, असा नरेटिव्ह तयार केला. उद्धव ठाकरेंना सहानुभूती मुंबई आणि कोकणात असती तर दिसायला पाहिजे होती. ठाण्यापासून कोकणच्या शेवटच्या टोकापर्यंत उद्धव ठाकरेंची एकही जागा आली नाही. कोकणात नाही, पालघर नाही, ठाणे जिल्ह्यात नाही, रत्नागिरी सिंधुदुर्ग, रायगड या भागात उबाठाला एकही जागा मिळालेली नाही. मुंबईत मराठी माणसाने मते दिले नाही. मराठी माणसाने व्होट दिलं असतं तर दक्षिण मुंबईत वरळीत आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात फक्त 6000 मतांचा लीड आहे. शिवडीत 35 -40 हजार लीड मिळाले असते. विक्रोळी भांडूप ईशान्य मुंबईत मध्ये 60 हजार लीड मिळाला असता, पण ते मिळालं नाही. याचा अर्थ मराठी माणूस त्यांच्यासोबत गेला नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 


संबंधित बातमी:


Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस पळणारा नाही तर लढणारा व्यक्ती, पुरंदरचा तह करुन पुन्हा सर्व किल्ले जिंकणारे शिवराय आमची प्रेरणा : देवेंद्र फडणवीस