मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात, राज्यात गॅस (Gas) आणि इंधनाचा तुटवडा होत असल्यासंदर्भात भूमिका मांडली. यावेळी, घरगुती गॅस सिलेंडरच्या 60 रुपयांच्या दरवाढीसंदर्भातील प्रश्नावरही त्यांनी उत्तर दिले. घरगुती गॅसचे दर 60 रुपयांनी वाढले आहेत. यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, लोकांमध्ये चुकीची माहिती देऊन पॅनिक तयार करू नका, भारत सरकारने अतिशय स्पष्टपणे या संदर्भातली भूमिका मांडली आहे. भारताच्या एनर्जी सिक्युरिटीच्या संदर्भात कशाप्रकारे मोदीजींनी पाऊल उचलली आहेत हे आपल्यासमोर आलेलं आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. 

Continues below advertisement

अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक पातळीवर परिणाम होत असून, त्याचा फटका भारतालाही बसत आहे. सध्या देशात एलपीजी गॅसची (Gas) तुटवड्याची परिस्थिती जाणवत आहे, आणि याचा सर्वात मोठा परिणाम हॉटेल उद्योगावर झाला आहे. कमर्शियल एलपीजी गॅसचे दर अचानक 150 ते 200 रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे हॉटेल व्यवसाय पुढे कसा चालवायचा, हा प्रश्न व्यवसायिकांसमोर उभा राहिला आहे. दुसरीकडे घरगुती गॅसच्या दरातही 60 रुपयांची वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या घराचे गणित बिघडले आहे. त्यातच, गॅस सप्लायही काही शहरांत बंद पडल्याचे पाहायला मिळते. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता, असा कुठलाही प्रकार नाही, माध्यमांनी लोकांना पॅनिक करू नये, भारत सरकारने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे, असे सांगितले. 

इंधनाची कुठलीही कमतरता नाही

दोन-तीन दिवस झाले काही माध्यमांनी चालवून दिलं की, पेट्रोल डिझेलचा तुटवडा होणार,  विनाकारण मोठ्या मोठ्या रांगा पेट्रोल पंपावर आपल्याला पाहायला मिळाल्या. भारत सरकारने सांगितलं की, अशी कुठलीही कमतरता होणार नाही. त्यामुळे भविष्यात जी परिस्थिती उद्भवेल याचा सामना करण्याकरता भारत सरकार मोदीजींच्या नेतृत्वात सक्षमपणे भक्कम परिस्थितीत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत बोलताना सांगितले. 

Continues below advertisement

गॅस दरवाढीमुळे महिलांच्या तक्रारी

पुण्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या दरांमुळे महिलांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सिलेंडरचे दर सातत्याने वाढत असल्याने त्याचा थेट परिणाम त्यांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. महिलांचे म्हणणे आहे की, गॅसचे दर वाढत आहेत, तेलाचे दर वाढत आहेत, किराणा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढले आहेत. मात्र आमचे पगार काही वाढत नाहीत. गॅस एजन्सीकडे गेल्यानंतर अनेक वेळा वेळेवर गॅस मिळत नाही, अशी तक्रारही महिलांनी केली आहे.

हेही वाचा

कॉलेज आणि शाळांमध्ये मुलींना लाठ्याकाठ्यांचे प्रशिक्षण, कमवा आणि शिका योजनेतून 2000 रुपये मिळणार; चंद्रकांत पाटलांची घोषणा