बुलढाणा : केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ओबीसी नेत्यांकडून त्याचं स्वागत केलं जात आहे. महाराष्ट्रातील ओबीसी नेते (OBC) तथा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही या निर्णयाचे स्वागत केले असून सामाजिक न्यायाच्या लढ्याला ऐतिहासिक यश आल्याचं म्हटलं आहे. तर, यापूर्वी जनगणनेत जात हा विषय नव्हता. पण आता जातनिहाय जनगणनेचा विषय मंजूर झाल्याने एका कमांडवर देशभरातली ओबीसी समाजाची लोकसंख्या हातात येणार आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तर, 2011 च्या जनगणनेत जातीचा कॉलम नव्हता, आता तो कॉलम अॅड केल्याचं सांगत भुजबळ यांनी या निर्णयाचे स्वागत केले. तसेच जातनिहाय जनगणनेसाठी आपण 20 वर्षांपासून आवाज उठवला,  सन २०१० मध्ये समता परिषदेने याच मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, असेही म्हटले. आता, भुजबळांच्या वक्तव्यावर ओबीसी नेते हरिभाऊ राठोड (Haribhau rathod) यांनी आक्षेप घेतला आहे. 

Continues below advertisement

जातिगत जनगणनेबाबत छगन भुजबळ धांदात खोटे बोलत आहेत, 2011 ची जनगणना झाली, तेव्हा सुद्धा जातीचे कॉलम होते. सन 2011 मध्ये ग्रामीण विभागाकडून झालेल्या जनगणनेसाठी पूर्ण देशामध्ये 20 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत, याची कबुली केंद्र सरकारने लोकसभेमध्ये दिली आहे. त्यावेळेस त्यांनी सांगितले की, जातिगत जनगणना झालेली आहे. परंतु काही तांत्रिक कारणामुळे तो डाटा व्यवस्थित जमा झाला नाही. याशिवाय एस.टी आणि एस.सी. सोडून इतर जातीची जनगणना आम्ही सार्वजनिक करणार नाही हे सुद्धा तत्कालीन सरकारने सांगितले होते. असं असताना मंत्री छगन भुजबळ हे कसे काय सांगत आहेत की 2011 च्या जनगणनेमध्ये जातीचा कॉलम नव्हता आणि आता जातीचा कॉलम आहे, असा प्रश्न ओबीसी नेते तथा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी विचारला. 

एकंदरीत छगन भुजबळ हे ओबीसीचे नेते असूनही पूर्णपणे बीजेपीकडे झुकल्याचे दिसत आहे. तसे पाहिले तर यापूर्वी मंत्री छगन भुजबळ यांनी बरेच काही नुकसान ओबीसीचे केले आहे, त्यांच्या मंत्रिमंडळात असाही निर्णय घेण्यात आला की एस. इ .बी .सी असा कुठलाही प्रयोग नसताना कायद्याद्वारे मराठा समाजाला ओबीसी म्हणून घोषित करण्यात आले. सन 2011 मध्ये जनतेची जी फसवणूक झाली तीच फसवणूक हे सरकार करत आहे. ओबीसींची वारंवार फसवाफसवी करणे थांबवावे अन्यथा एक दिवस ओबीसी नक्कीच जागा होईल आणि बीजेपीला घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही. ओबीसींना आपण किती दिवस फसवणार आहात, असेही हरिभाऊ राठोड यांनी म्हटले. 

Continues below advertisement

भुजबळांकडून मोदींचे आभार, कोर्टाचा दाखला

मी मोदी साहेबांचे एका कार्यक्रमात जाहीर आभार मानले, समता परिषद स्थापनेनंतर जिथे जिथे ओबीसी मेळावे झाले त्या ठिकाणी आम्ही जातनिहाय जनगणना करा अशी मागणी केली होती. ज्या ज्या वेळी ओबीसी समाजाला काही द्यायचे असते, त्या त्या वेळी कोणीतरी कोर्टात जाते. मग कोर्ट विचारते संख्या किती? यापूर्वी जातनिहाय जनगणना 1931 साली झालेली आहे. त्यावेळी ती 54 टक्के लिहिली आहे, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली. तसेच, कोर्ट नेहमी विचारते आता ओबीसींची लोकसंख्या किती आहे ते सांगा. त्यामुळे, आमची मागणी सातत्याने होती, आहे. जातनिहाय जनगणना होते आहे, अतिशय आनंदाची गोष्ट आहे, असेही भुजबळ यांनी म्हटले.

हेही वाचा

गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास