मुंबई: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे भाजपचे सर्वाधिक नुकसान होणार आहे. भाजप महाराष्ट्रातील ज्या लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक लढत आहे, त्यापैकी काही जागांवर भाजप पक्ष (BJP) तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेल्या आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, असे वक्तव्य वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबडेकर (Prakash Ambedkar) यांनी केले. ते मंगळवारी 'एबीपी माझा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते. 


या मुलाखतीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांवर गंभीर आरोप केले. महाविकास आघाडीला भाजपसोबत सेटलमेंट करायची होती. काँग्रेस, शिवसेना आणि शरद पवार यांनी भाजपसोबत तडजोड केली आहे. याचे उदाहरण द्यायचे झाले तर बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्यासमोर पाचवेळा हरलेला उमेदवार उभा करण्यात आला आहे. तर काँग्रेसची भिवंडीची जिंकणारी जागा शरद पवार गटाने घेतली. कल्याण लोकसभेत श्रीकांत शिंदे यांच्यासमोर हरणारा उमेदवार उभा करण्यात आला आहे, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.


शिवसेनेची मतं भाजपला ट्रान्सफर होणार नाहीत: प्रकाश आंबेडकर


आजपर्यंत शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकत्र लढत होते. त्यामुळे सर्व मतं त्यांना पडत होती. मात्र, आता शिवसेना भाजपसोबत नाही. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेची मतं भाजपला ट्रान्सफर होणार नाहीत, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. हिंदू-मुस्लीम वातावरण झालं की, भाजपचा विजय होतो. मशीद, मंदिरावर एक दगड जरी टाकला की दंगली घडतात. अशा परिस्थितीत समोरासमोरच्या लढाईत भाजपचा विजय होतो. त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीसोबत गेलो नाही. आतादेखील हिंदू-मुस्लीम वातावरण निर्माण झाले नाही तर भाजपचा पराभव निश्चित आहे. दोन पक्ष फोडूनही भाजपला आत्मविश्वास नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. 


आणखी वाचा


भाजपला बिनशर्त पाठिंबा दिल्याच्या मोबदल्यात राज ठाकरेंना काय मिळणार? भाजपचा बडा नेता म्हणाला...