Ambadas Danve on Majha Katta : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) आपल्याला भाजप (BJP) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून (Shiv Sena) ऑफर होती, असा मोठा गौप्यस्फोट विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी 'माझा कट्टा' कार्यक्रमात केला आहे. 

अंबादास दानवे म्हणाले की, राजकारणात अशा ऑफर येत असतात. तेव्हा सगळ्यांसमोर हे सांगितलंच पाहिजे असे काही नाही. लोकसभेवेळी मला निवडणूक लढवण्याची ऑफर होती. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पण होती आणि भाजपकडून पण होती. पण मी म्हटलं, मी बाळासाहेबांचे विचार सोडणार नाही. कारण पदं येतील आणि जातील. नाही मिळालं तर नाही मिळालं. आता देखील नाही मिळालं तरी चालेल, काही चिंता नाही. संघटनेचं काम करू. पण, पदासाठी पक्ष बदलणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. अंबादास दानवे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

आमची संघटना कुणीतरी फोडली याची सल : अंबादास दानवे

दरम्यान, दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात का? असा सवाल अंबादास दानवे यांना विचारला असता शिवसेना फुटली, त्यावेळी मनाला वेदना झाल्या. आम्ही काही सत्तेसाठी जन्मलेलो नाही. आमची संघटना फुटली. मनाला झालेली ही वेदना कधी ना कधी भरुन यावी, हीच अपेक्षा आहे. आमची एवढी मजबूत संघटना फुटली, ती कुणीतरी फोडली याची मनाला कायम सल राहिली. आता शिवसेना म्हणून एकत्रित ताकद राज्याला दिसली पाहिजे. तशी आशा ठेवायला काय हरकत आहे? असे त्यांनी म्हटले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून अंबादास दानवे यांचे हे शेवटचे अधिवेशन होते. विरोधी पक्षनेते म्हणून ऑगस्टपर्यंत त्यांचा कार्यकाळ आहे. शिवसेना फुटल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम राहणं पसंत केलं होतं. आता शिवसेनेच्या फुटीवर त्यांनी खंत व्यक्त केली. त्याचवेळी दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. 

अजित पवार यांच्या खात्यात मोठा भ्रष्टाचार : अंबादास दानवे 

दरम्यान, अजित पवार यांच्या खात्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप देखील अंबादास दानवे यांनी केला आहे. ते म्हणाले की. मुंबईमध्ये अदानींना सगळ्या जागा देणे. मोहित कंबोज नावाची व्यक्ती भाजपमध्ये सगळ्या ठिकाणी चुकीचं करत आहे. याला सपोर्ट भाजप करत आहे. शिंदे गटात देखील भ्रष्टाचार आहे. अजितदादांच्या खात्यातील एक्साईजमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. पण, कोणीही त्याच्यावर सिरीयस घेत नाही. सरकार कारवाई करत नाही. आम्ही बोलत असतो, बोलण्याशिवाय काय करणार? आम्ही कोणावर कारवाई करू शकतो का? धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला तीन महिने लागले. शिरसाट यांचे भ्रष्टाचार सिद्ध झाले. उच्चस्तरीय चौकशी नेमली पण सरकारने काय केलं. संजय राठोड यांच्या विरोधात भाजपच्या संदीप जोशी यांनी मोठं पत्र दिला आहे. पण, काहीही होत नाही, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. 

आणखी वाचा 

Devendra Fadnavis-Aditya Thackeray: देवेंद्र फडणवीसांसोबत भेट झाल्याची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले, आता एक व्यक्ती गावी जाईल!