मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit pawar) यांच्या पक्षातील विद्यमान आमदार सतिश चव्हाण यांच्यावर थेट कारवाई करण्यात आली असून जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे आणि पक्षशिस्त मोडल्याबद्दल आमदार सतीश चव्हाण यांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी याबाबत माहिती दिली, तत्पूर्वी दोन दिवसांपूर्वीच त्यांनी सतिश चव्हाण यांचे पत्र गंभीर असल्याचे सांगत त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यात येईल, असे संकेत देण्यात आले होते. 15 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुती सरकारच्या विरोधात प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका छत्रपती संभाजीनगरचे आमदार सतीश चव्हाण (Satish chavan) यांनी घेतली होती. वास्तविक सर्व समाजघटकांना न्याय देण्याची भूमिका महायुती सरकारच्या कार्यकाळात घेतलेली आहे. असे असताना आमदार सतीश चव्हाण यांनी जाणीवपूर्वक शिस्तभंग केलेला असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे तटकरे यांनी सांगितले. 


 महायुती सरकारने बहुजन समाजाला न्याय दिला नाही, असं सतीश चव्हाण यांनी म्हटलं होतं. विशेष म्हणजे चव्हाण यांनी थेट पत्र लिहूनच आपली भूमिका जाहीर केली होती. महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम मंगळवारी (दि.15) निडवणूक आयोगाने जाहीर केला. मागील अडीच वर्षांपासून राज्यात भाजप शिवसेनेचे सरकार आहे. मागील दीड वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सरकारमध्ये सहभागी झाला. राज्यातील बहुजनांचे प्रश्न सुटतील या उद्देशाने आम्ही या महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झालो होतो. मराठा, धनगर, ओबीसी, आदिवासी, मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार मार्ग काढेल अशी अपेक्षा होती. मात्र, महायुतीचे सरकार यावर मार्ग काढू शकले नाही, बहुजनांचे प्रश्न हे महायुतीचे सरकार सोडवू शकले नाही, अशी खंत मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.


चव्हाण यांच्या भूमिकेवर तटकरेंची उघड नाराजी


आमदार सतिश चव्हाण यांचे पत्र  वाचनात आले असून ते अत्यंत गंभीर आहे. पक्षाची शिस्त ज्यांच्याकडून भंग होईल ती व्यक्ती कितीही मोठी असली तरी त्याच्यावर निश्चित कारवाई केली जाईल. आमदार किंवा पक्षाचे वरीष्ठ नेते असतील त्यांच्याकडून अशी बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही असा स्पष्ट इशारा देतानाच याविषयी राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्याशी चर्चा करेन शिवाय सतिश चव्हाण यांच्याशीही बोलून त्यांनी काय मानसिकतेतून हे वक्तव्य केले आहे हे जाणून घेईन. इतरवेळी न बोलता यावेळी बोलण्याचे कारण काय हेही समजून घेऊ. तरीही ते आपल्या विचारावर ठाम असतील तर त्यांच्यावर तातडीने कारवाई ही केली जाईल, असेही सुनिल तटकरे यांनी म्हटले होते. त्यानुसार, आता कारवाई करण्यात आली आहे.  


हेही वाचा