Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या अमेडीया होल्डिंग्स एलएलपी या कंपनीने तब्बल 1,800 कोटी रुपयांच्या बाजारभावाची जमीन केवळ 300 कोटी रुपयांत विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर आता अजित पवारांच्या दुसऱ्या मुलावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी गंभीर आरोप केलेत.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “अजित पवार स्वतःची संपत्ती लपवण्यासाठी आणि तुरुंगवासाच्या भीतीमुळे भाजपात गेले आहेत. मात्र भाजपात गेल्यानंतरही त्यांचे कारनामे थांबलेले नाहीत. दोन्ही मुलांना ते नंबर दोनचे धंदे करायला लावतात, आणि स्वतः दस नंबरी बनून उपमुख्यमंत्रीपदाची खुर्ची घट्ट पकडून ठेवली आहे,” अशी टीका त्यांनी केलीय.
Hashvardhan Sapkal on Ajit Pawar: ‘टँगो’ दारू कंपनीचं नाव आल्याने नवा वाद पेटला
सपकाळ यांनी पुढे सांगितले की, अजित पवार यांच्या एका मुलाचा भ्रष्टाचार हे पुण्यातल्या या जमिनीच्या प्रकरणातून आलेला आहे. दुसरे जे चिरंजीवांची त्यांची टँगो नावाची दारू कंपनी आहे. या देशी दारूच्या टँगो कंपनीला लाभ देण्याच्या अनुषंगाने अजित पवार यांनी अनेक निर्णय घेतले आहे. टँगो या कंपनीला संरक्षण देण्यासाठी त्या विभागात अबकारी विभागाचं मंत्रिपदसुद्धा अजित पवारांनी आपल्याकडे ठेवले आहे, जेणेकरून दुसऱ्या मुलाला टँगोच्या माध्यमातून लाभ दिला जाईल. त्यामुळे असा डबल धमाका, डबल भ्रष्टाचार, डबल दोन नंबरचे काम अजित पवारांकडून सरसकट सर्रास सुरू आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केलाय.
Ajit Pawar: अजित पवारांना भस्म्या आजार झालाय
दरम्यान, “राज्यात शेतकरी कर्जमाफीसाठी आक्रोश करत आहेत, पण अजित पवार त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. ते ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्याच जिल्ह्यात आपल्या मुलाला स्टॅम्प ड्युटी माफ करतात. अजित पवारांना ‘भस्म्या’ नावाचा आजार झाला आहे. हा असा आजार की किती खाल्लं तरी अधिक खावंसं वाटतं. आधीच एवढं खाल्लंय, तरी अजून किती खाणार?” असा उपरोधिक सवाल देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केलाय.
Ambadas Danve on Ajit Pawar: अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी
दरम्यान, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण समोर आल्यानंतर विरोधकांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अंबादास दानवे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलंय की, मुलगा पुण्यात 300 कोटींचा व्यवहार करतो, हे पित्याला ज्ञात नाही आणि जेव्हा या मुलाचे वडील पुण्याचे पालकमंत्री आहेत. तुमचं तुम्हाला तरी पटतंय का हे बोलताना? बाजार भावापेक्षा कमी दरात जमीन घेतली गेली आहे, खडसेंचा राजीनामा घेतला गेला होता. चौकशी होईपर्यंत नैतिकता राखून तुम्हीही राजीनामा द्या. न्या. झोटिंग समितीच्या धर्तीवर कोरेगाव पार्क प्रकरणातही समिती मुख्यमंत्री महोदयांनी नेमावी, अशी मागणी त्यांनी केलीय.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा