पुणे : आपल्या वादग्रस्त विधानांमुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ऐन लोकसभा निवडणुकांवेळी (Loksabha Election) केलेल्या विरोधामुळे चर्चेत असलेले माजी मंत्री विजय शिवतारे यांनी पुन्हा एकदा अजित पवार (ajit Pawar) यांच्याबाबत विधान केलं आहे. मात्र, यावेळी अजित पवार यांच्यासमवेत आपली मैत्री असल्याचं शिवतारे यांनी म्हटलं. सासवड येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात विजय शिवतारे सहभागी झाले होते. त्यावेळी, एबीपी माझाशी बोलताना त्यांनी अजित पवार हे आपले मित्र असून त्यांच्याबद्दल मिठाचा खडा पडेल, असं कुठलंही वक्तव्य मी करणार नाही, असेही विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी म्हटले. त्यामुळे, आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीतून शिवतारे यांनी तयारी सुरू केल्याचं दिसून येत आहे. 


संत सोपान काकांच्या पालखी सोहळ्यात माजी मंत्री विजय शिवतारे सहभागी झाले होते. तर, मंगळवारी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातही विजय शिवातरेंचा सहभाग दिसून आला. यावेळी, बोलताना त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये आपण आमदार आणि मंत्री व्हावे, हीच मागणी पांडुरंगाकडे केल्याचं शिवतारे यांनी म्हटलं आहे. पालखी सोहळा सासवड नगरीत येणे म्हणजे आमच्यासाठी भाग्याचा क्षण आहे. पालखी सासवडमध्ये उशिरा येण्यामागे प्रशासन काही प्रमाणात जबाबदार आहे, ही काळी नजर कुणाची आहे हे आमदारांना विचारावे लागेल, असे शिवतारे यांनी म्हटले. तसेच, मी स्वतः साठी निवडून न येता लोकांसाठी निवडून येतो, असेही ते म्हणाले. 


मी लहानपणी फार मस्तीखोर, बंडखोर होतो, पण अभ्यास न करता देखील शाळेत हुशार होतो. तर, चौथीत असताना बिड्या पित असल्याचा खळबळजनक खुलासाच विजय शिवातरे यांनी सासवडमधील विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात बोलताना केला होता. शिवतारे यांनी बालपणीच्या आठवणींना दिलेला उजाळा माध्यमांत आणि राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेत ठरला होता. तत्पूर्वी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांविरुद्ध त्यांनी पुकारलेले बंडही राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारे ठरले. मात्र, त्यांनी काही दिवसांतच त्यांनी आपले बंड शमवले होते. आता, पुन्हा एकदा त्यांनी अजित पवारांबद्दल वक्तव्य केलं असून अजित पवार माझे मित्र आहेत, हे सरकार पुन्हा यावे आणि मी मंत्री व्हावे, अशी इच्छाही त्यांनी बोलून दाखवली आहे.   


मी मंत्री व्हावं हेच पांडुरंगाला मागणे


अजित पवारांबद्दल, मी महायुतीत मिठाचा खडा पडेल असे काही वक्तव्य करणार नाही, साखर पडेल असेच मी बोलेल. अजित पवार माझे मित्र आहेतस, हे सरकार परत यावे, मी आमदार व्हावे आणि मंत्री व्हावे अशी मागणी आपण पांडुरंगाकडे केल्याचंही विजय शिवतारे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले.