मुंबई : राजधानी दिल्लीतील आंदोलनास देशभरातून पाठिंबा वाढत असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हेही उद्या 22 जुलै रोजी दिल्लीतील जंतरमंतरवर जाऊन आदोलकांनी भेट घेणार आहेत. दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जनंतर देशभरातून संताप व्यक्त होत असून आणखी विद्यार्थी, तरुणाई आंदोलनात सहभागी होत आहे. आता, आदित्य ठाकरेंनी आंदोलनावरुन केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनाही लक्ष्य केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या आंदोलनाला फेसलेस म्हणत अपप्रवृत्ती आंदोलनात घुसल्याचा आरोपही केला आहे. त्यावर, फेसलेस असलेल्या आंदोलनाने भाजपच्यात तोंडाला फेस आणल्याचा पलटवार ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केलाय. 

Continues below advertisement

गेले दोन आठवडे पाहतोय, दिल्लीत तरुण आंदोलन करत आहेत. सोमन वांगचूक यांची भेट घेण्यासाठी आमचे खासदार गेले होते, पण आमच्या खासदारांना भेटू दिले नाही. काल आपण बघितलं की संसद भवनला त्यांनी मोर्चा काढला, आम्हाला वाटलं कोणी मंत्री त्यांना भेटेल, चर्चा करेल. पण, ब्रिटिशकालीन अत्याचारापेक्षा भयंकर अत्याचार आपण काल पाहिल्याचे आदित्य ठाकरेंनी म्हटले. पोलिसांनी आंदोलनातील महिलांना मारलं, लहान मुलांना मारलं रॅपिड ऍक्शन फोर्सवाल्यांनी नावाच्या पाट्या सुद्धा काढल्या होत्या. यापूर्वी भाजप सरकारने शेतकऱ्यांना अर्बन नक्षल म्हटलं होतं, त्यांच्यावर गाड्या घातल्या होत्या. 

मुंबईतील शिवाजी पार्क चैत्याभूमीवर सुद्धा शांततेत आंदोलन सुरु केलं तिथे सुद्धा पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. आमचे कार्यकर्ते धावून गेले, त्या मुलांना सोडवलं अशी माहिती आदित्य यांनी दिली. मात्र, त्या मुलांना आज सकाळी पुन्हा नोटीस पाठवल्या असून पोलीस स्टेशन मध्ये बोलवलं आहे. त्यामुळे, shivsenaubtlegal@gmail.com  हा मेल आयडी आम्ही जाहीर केला आहे. जर तुम्ही नीट परीक्षा आणि सोनम वांगचूक समर्थनार्थ मोर्चा केला आणि आंदोलन केलं आणि गुन्हे दाखल झाले तर आम्ही तुम्हाला कायदेशीर मदत करू, तुम्ही फक्त मेल करा, असे आदित्य ठाकरेंनी म्हटलं. 

Continues below advertisement

भाजप विरोधात आणि या सगळ्या प्रकरणावर आंदोलनात तुम्हाला अडचण झाली तर मी वकिलांना सुद्धा आवाहन करतो विद्यार्थ्यांना मदत करा. सगळ्या संघटना विद्यार्थ्याच्या बद्दल बोलत आहेत, त्यांच्यासोबत उभ्या आहेत, त्यात ABVP कुठे आहे? ही एकच संघटना कुठेही दिसत नाहीये. भाजप देशद्रोही विद्यार्थीद्रोही आहे, असे म्हणत एबीव्हीपीच्या भूमिकेवर आदित्य यांनी प्रश्न उपस्थित केला. तसेच, उद्धव ठाकरे उद्या दिल्लीत जाणार आहेत, तिकडे ते आंदोलकांना भेट देतील, अशी माहिती देखील त्यांनी दिली. 

फेसलेस आंदोलनाने भाजपला फेस आणलाय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीतील आंदोलन फेसलेस असल्याचं म्हटलं होत. त्यावर, आता आदित्य ठाकरेंनी पलटवार केला आहे. देवेंद्र फडणवीस हे 10 वर्ष गृहमंत्री राहिले आहेत, त्यांच्या इंटेलिजन्सला वाटतं की ही लहान मुलं अराजकता माजवतील. फेसलेस आंदोलन आहे म्हणून भाजपला फेस आणलाय या आंदोलनाने, असा टोलाही आदित्य यांनी फडणवीसांना लगावला. 

नीच, राक्षसी प्रकारचं आंदोलन - अमित ठाकरे

फडणवीसांनी फेसलेस आंदोलन म्हटल्यानंतर अमित ठाकरे म्हणाले की, या फेसलेस लोकांमुळे तुम्ही मुख्यमंत्री पदावर बसलात हे तुम्ही विसरू नका. तुम्हाला ते बसवू शकतात तर ते उचलू पण शकतात. सकाळी बोलणारे भाजपचे प्रवक्ते कुठे गेले? त्यांना या विषयावर बोलावसं वाटत नाही का? नीच, राक्षसी प्रकारचे हे राजकारण सुरू आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

हेही वाचा

दिल्लीतील आंदोलन चिघळले, देशभर पडसाद; वंचित बहुजन आघाडीकडून 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक