परभणी : जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील कोल्हावाडी ग्रामपंचायतीने त्रिमूर्ती उत्पादक महिला बचत गटाच्या पुढाकारातून जिल्ह्यातील पहिली ‘बर्तन बँक’ सुरू केली. त्या माध्यमातून धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांत प्लास्टिकला पूर्णविराम देत स्टीलच्या भांड्यांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. 1 मार्च रोजी या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
भागवत सप्ताह असो किंवा इतर कोणतेही धार्मिक, सामाजिक कार्यक्रम असोत, गावात आता स्टीलच्या ताट-वाट्या आणि ग्लासचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. यामुळे एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक वस्तूंना पूर्णविराम मिळणार आहे.
Bartan Bank Initiative : ‘बर्तन बँक’ उपक्रमाची सुरुवात
‘माझी वसुंधरा’ अभियानात मराठवाडा विभागात अव्वल क्रमांक पटकावलेल्या कोल्हावाडी ग्रामपंचायतीने पर्यावरण संवर्धनाची भूमिका अधिक बळकट करण्याचा निर्धार केला आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
या अंतर्गत त्रिमूर्ती उत्पादक महिला बचत गटाने स्टीलची भांडी खरेदी केली असून गावातील सर्व कार्यक्रमांसाठी हीच भांडी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. भांड्यांसाठी नाममात्र दर आकारण्यात येणार असल्याने ग्रामस्थांनाही हा उपक्रम सोयीस्कर ठरणार आहे.
Plastic Ban Enforcement : प्लास्टिक विक्रीवर दंडात्मक कारवाई
ग्रामपंचायतीने प्लास्टिकमुक्तीबाबत कडक भूमिका घेतली आहे. गावातील किराणा दुकानदारांनी प्लास्टिकचे द्रोण किंवा पत्रावळी विक्री केल्यास 5 हजार रुपयांचा दंड आकारला जाईल, अशी स्पष्ट ताकीद देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे पर्यावरणपूरक संस्कृती रुजवण्यास मोठी मदत होणार आहे. महिला बचत गटाच्या सहभागामुळे ग्रामीण भागात शाश्वत विकास आणि स्वावलंबनाचा आदर्श निर्माण होत असल्याचे चित्र आहे. कोल्हावाडी ग्रामपंचायतीचा हा उपक्रम जिल्ह्यासाठी मार्गदर्शक ठरत असून इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरू शकतो.
ही बातमी वाचा:
