परभणी:  परभणी जिल्ह्यातील (Parbhani) शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना 40 कोटींचा अग्रीम पीकविमा मंजूर झाला असून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरवात झाली आहे. अतिवृष्टीमुळे कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 


पंतप्रधान पीक विमा योजनेतील मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी परभणी जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील आठ मंडळात 73 हजार 814 सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 40 कोटी 71 लाख 12 हजार रुपये अग्रीम विमा मंजूर करण्यात आला होता. ऑगस्ट महिन्यात परभणी जिल्ह्यातील आठ महसूल मंडळात 26 दिवस पावसाचा खंड पडला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी 6 सप्टेंबरला शासकीय अधिकारी व विमा कंपनीचे प्रतिनिधींना सोयाबीनच्या नुकसानीसंदर्भात संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार या मंडळातील मागील 7 वर्षातील सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत यंदा सरासरी उत्पादनात 50 टक्क्यापेक्षा अधिक घट झाली असल्याचे आढळून आले होते त्यानुसार icici लोंबर्ड जनरल इन्शुरन्स कंपनीने यासाठीची मंजूर रक्कम आता शेतकऱ्यांचा खात्यात जमा करण्यास सुरू केली आहे. सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.  


या मंडळात असे मिळत आहेत पैसे



  • गंगाखेड तालुक्यातील माखणी मंडळातील 13,626 शेतकऱ्यांना 6697 प्रति हेक्टरीप्रमाणे 5.26 कोटी

  • जिंतूर तालुक्यातील  दुधगाव मंडळातील 9,184 शेतकऱ्यांना 6,421 प्रमाणे 5.16 कोटी

  • मानवत तालुक्यातील रामपुरी मंडळातील 6,063 शेतकऱ्यांना 6248 प्रति हेक्टरीप्रमाणे 3.99 कोटी

  • परभणी तालुक्यातील जांब मंडळातील 10,953 शेतकऱ्यांना 6392 प्रतिहेक्टरी प्रमाणे 6.40 कोटी

  • परभणी तालुक्यातील सिंगणापूर मंडळातील 8,063 शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 6,363 प्रमाणे 4.80 कोटी

  • झरी मंडळातील 10,537 शेतकऱ्यांना 6,193 प्रतिहेक्टरी याप्रमाणे  6.01 कोटी

  • पुर्णा तालुक्यातील चुडावा मंडळातील 8,778 शेतकऱ्यांना 7,018 प्रतिहेक्टरीप्रमाणे 4.31 कोटी रुपये

  • सोनपेठ मंडळातील 6,005 शेतकऱ्यांना 6,763.85 प्रतिहेक्टरी प्रमाणे 4.16 कोटी 

  • एकूण 73 हजार 814 शेतकऱ्यांच्या खात्यावर 40.71 कोटी रुपये जमा होत आहेत.