पालघर : वसईत एक धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार समोर आला आहे. एका कंपनीत अज्ञातांनी महिलांच्या पिण्याच्या बॉटलमध्ये युरिन टाकलं होतं. त्यातील एका महिलेने पाणी समजून चकून ते प्यायल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर कंपनीतील तिन्ही मुलींनी थेट माणिकपूर पोलीस ठाणे गाठलं. तेथे त्यांनी आपली लेखी तक्रार दिली आहे. यावर आता पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. 


वसई पूर्वेच्या इंमिटेशन ज्वेलरी बनवणाऱ्या विशाल 110 या कंपनीतील ही धक्कादायक घटना आहे. या कंपनीत मुक्ती बरुड, प्रिती गायकर आणि रेखा जाधव या तीनच मुली काम करतात. रात्रीच्या वेळी या कंपनीत दुसऱ्या कंपनीतील चार कामगार झोपण्यासाठी येतात. 


शुक्रवारी सकाळी कंपनीत आल्यावर त्यातील एक मुलगी पिण्याच्या बाटलीतील पाणी प्यायली. मात्र ते घाणेरडं लागल्याने तिने उलटी केली. ती बाटली नीट पाहिल्यानंतर त्यामध्ये युरिन असल्याचं लक्षात आलं. इतरही दोन बाटल्यांमध्ये युरिनच ठेवण्यात आलं होतं.


मालकाने उलटा मुलींवरच संशय व्यक्त केला


हा किळसवाना प्रकार रात्री झोपायला आलेल्या कामगारांनीच केल्याचा आरोप या मुलींनी केला. याची तक्रार कंपनीच्या मालकाकडे केली असता त्या मालकाने उलट त्या मुलींवरच संशय घेतल्याची माहिती आहे. त्यानंतर संतापलेल्या त्या मुलींनी थेट वसईचं माणिकपूर पोलीस ठाणे गाठलं आणि आपली लेखी तक्रार पोलिसांना दिली. 


आरोपींसह कंपनीच्या मालकावर कारवाई करा अशी मागणी तक्रारदार मुलींनी केली आहे. माणिकपूर पोलिस आता या घटनेची चौकशी करत असल्याची माहिती माणिकपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू माने यांनी दिली. 


ही बातमी वाचा: