Cyrus Mistry Accident : उद्योगपती सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांच्या अपघाती निधनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-अहमदाबाद महामार्गाला पालघर जिल्ह्याच्या (Palghar District) हद्दीत जोडणारे अनधिकृत फाटे बंद करण्यात आले होते. पण बंद करण्यात आलेले अनधिकृत फाटे अवघ्या काही दिवसातच पुन्हा सुरु करण्यात आले आहेत. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर (Mumbai-Ahmedabad Highway) पालघर जिल्ह्याच्या हद्दीत धोकादायक स्पॉट्स असून, त्या ठिकाणी अपघातांची मालिका सुरू आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरचे फाटे हे हॉटेल आणि पेट्रोलपंप चालकांच्या फायद्यासाठी काढण्यात आल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. तसंच या प्रकरणात जिल्हा प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केला जात आहे. 


मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्याच्या हद्दीत अनेक ब्लॅक स्पॉट असून त्या ठिकाणी अपघातांची मालिका वारंवार सुरूच आहे. सायरस मिस्त्री यांच्या झालेल्या अपघातानंतर जिल्हा प्रशासन आणि महामार्ग प्राधिकरणाला जाग आली आणि त्यानंतर वारंवार होणाऱ्या अपघातांच्या ठिकाणी असलेले कट डिव्हायडर टाकून बंद करण्यात आले होते. मात्र हे बंद केलेले कट पुन्हा एकदा काही ठिकाणी सुरू केलेले पाहायला मिळत आहेत. हे बंद केलेले कट कोणी तोडले? याची कोणताही माहिती अद्याप मिळालेली नाही. तरी पुन्हा एकदा या महामार्गावर अपघातांना आमंत्रण दिलं जात असल्याचं समोर येत आहे. हे कट हॉटेल आणि पेट्रोल पंप चालकांच्या फायद्यासाठी तोडण्यात आल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात असला तरी यावर आता जिल्हा प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्याची मागणी देखील केली जात आहे. 


प्रसिद्ध उद्योजक सायरस मिस्त्री यांच्या अपघातानंतर अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अछाड ते घोडबंदरपर्यंत जवळपास 29 ब्लॅकस्पॉट असून सर्वच ठिकाणी वेगवेगळ्या सुरक्षा उपाययोजना करायला सुरुवात करण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्यानं सिग्नल यंत्रणा दोन लेनमध्ये अनधिकृत असलेले कट बंद करणं, त्याचप्रमाणे सूचना देणारे फलक अशा उपाययोजना करण्यात आल्या होत्या. परंतु, काहीच दिवसांत बंद केलेले अनधिकृत कट (फाटे) पुन्हा सुरू करण्यात आले आहे. 


मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्याच्या हद्दीत वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या ठिकाणी ब्लॅक स्पॉट घोषित करण्यात आले आहेत. हे ब्लॅक स्पॉट बुजवण्याचं काम मागील दोन महिन्यांपासून हाती घेण्यात आलं आहे. मात्र असे अनधिकृत बुजवलेले कट कोणी अनधिकृत रिक्त पुन्हा सुरू करत असेल, तर महामार्ग प्राधिकरणाकडून फिर्याद घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असं आश्वासन यानंतर पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिलं आहे. 


दिग्गज उद्योजक सायरस मिस्त्रींचा अपघाती मृत्यू 


प्रसिद्ध उद्योजक सायरस मिस्त्री यांचा वयाच्या 54 व्या वर्षी अपघात झाला होता. याच अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुपारी सव्वा तीनच्या सुमारास अहमदाबादवरुन ते मुंबईला येत असताना हा अपघात झाला होता. पालघरमधील चारोटी येथे मिस्त्री यांच्या मर्सिडिस कारचा अपघात झाला होता. डिव्हायरला गाडी धडकल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती पालघर पोलीस अधिक्षकांनी दिली होती. या संदर्भात अधिकचा तपास पोलीस करत असल्याची माहितीही त्यांनी दिली होती. अपघात झाल्यानंतर तात्काळ दोघांचा मृत्यू झाला होता. तर इतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सायरस मिस्त्रींच्या अपघाती निधनाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. 


मिस्त्री हे अहमदाबादहून मुंबईला मर्सिडीज कारमधून परतत असताना दुपारी साडेतीनच्या सुमारास मुंबईला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यात त्यांची कार डिव्हायडरला आदळली, तेव्हा हा अपघात झाला होता. कारमध्ये 4 लोक होते, ज्यामध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू झाला होता. महिला कार चालवत होती. मिस्त्री यांच्याशिवाय जहांगीर दिनशा पंडोल नावाच्या व्यक्तीचाही अपघातात मृत्यू झाला. जखमींमध्ये अनायता पांडोळे (महिला चालक) आणि दारियस पांडोळे यांचा समावेश होता. त्यांच्यावर गुजरातमधील वापी येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर दोन महिन्यांच्या चौकशीनंतर महिला कार चालक डॉ अनाहिता पंडोल यांच्याविरोधात पालघरच्या कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.