Gazette Aurangabad and Osmanabad district Name change : औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव झाल्यानंतर फक्त शहराचं नामांतर झाले की जिल्ह्याचं असा प्रश्न उपस्थित झाला होता. पण आता यावरुन पडदा उठला आहे. राज्य सरकारकडून याबाबत राजपत्र (Gazette) जारी करण्यात आले आहे. यामध्ये संपूर्ण जिल्हा आता छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव म्हणून झाल्याचं सांगण्यात आले आहे. 


उस्मानाबाद शहराचे धाराशिव आणि औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण झाल्यानंतर त्या त्या जिल्ह्याचे नाव बदलण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्याप्रमाणे आज उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव जिल्हा आणि औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजी नगर जिल्हा असे राज्य सरकारने राजपत्र नोटिफिकेशन जारी केले आहे. त्यामुळे आजपासून शहराप्रमाणेच या दोन्ही जिल्ह्यांची नावं बदलण्यात आली आहेत. महसूल आणि वन विभागाकडून आज अधिकृत परिपत्रक काढण्यात आले आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 कलम 4 च्या पोट कलम (1) चे खंड सहा या अधिकाऱ्यांचा वापर करत जिल्ह्याचं नाव बदलण्यात आल्याचं सांगण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात औरंगाबाद शहराचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’आणि उस्मानाबाद शहराचे नाव ‘धाराशिव’ करण्याच्या  राज्य शासनाच्या प्रस्तावास केंद्र सरकारची मंजुरी मिळाली होती. 




हरकत नोंदवता येणार. 


दरम्यान महसूल आणि वन विभागाकडून जारी करण्यात आलेल्या राजपत्रानुसार (Gazette)  या निर्णयाबाबत कोणताही आक्षेप असल्यास त्यांना हरकत किंवा सूचना नोंदवता येणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात याबाबत उपरोक्त दिनांकपूर्वी प्राप्त होतील त्या हरकती व सूचना शासनाकडून विचारात घेण्यात येतील, असे आदेशात म्हटले आहे. तसेच सरकराने काढलेला आदेश 27 मार्च 2023 रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे. 


न्यायालयात सुनावणी! 


दरम्यान एकीकडे सरकराने जिल्ह्याचे नाव बदलण्याचे राजपत्र काढले असतानाच, दुसरीकडे आज यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी देखील झाली आहे. उच्च न्यायालयात आज औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव नामांतर करण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाला आव्हान दिलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायमूर्ती मारने यांच्या बेंचसमोर याचिकेकर्ते मुश्ताक अहेमद व मोहंमद हिशाम उस्मानी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर ही सुनावणी झाली. यावेळी 24 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद व उस्मानाबाद नामांतरबाबत केंद्र शासनाने जे नोटीफीकेशन काढले त्याची माहिती न्यायालयात देण्यात आली. त्यानंतर 24 मार्च पर्यंत केंद्र शासनाने नामांतरबाबत आपले उत्तर सादर करण्याचे आदेश दिले.




मागील अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहराचं नामकरण ‘ छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नामकरण’धाराशिव’ करण्याची मागणी करण्यात येत होती. संबंधित दोन्ही शहरांचं नामकरण करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला होता. त्यानंतर राज्य सरकारने हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता. त्यानंतर केंद्र सरकारने दोन्ही शहरांचं नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.