या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून करण्यात येत आहे. या अभिषेकाचं स्वरूप बदलून चल पादुकांचे अभिषेक केले जाणार आहेत. पण पुजाऱ्यांची याला संमती नसल्याने यावरून वाद होण्याची शक्यता आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीच्या विश्वस्त समितीची बैठक आज पार पडली. या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आला.
दरम्यान या निर्णयाला काही पुजारी आणि काही वारकऱ्यांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विश्वस्त कमिटीने आळंदी पोलीस स्थानकात देखील याबाबत सुरक्षा मिळण्यासाठी अर्ज केला आहे. समाधीवर अभिषेक आणि पूजा पद्धतीत बदल करण्यात आला असून एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयाची अमलबजावणी उद्या, २७ तारखेपासून करण्यात येणार आहे. या निर्णयाला काही व्यक्तींकडून अडथळा, अटकाव आणला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्त द्यावा, अशी मागणी विश्वस्त कमिटीने केली आहे.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी ही संजीवन असून ती समाजाच्या चिरंतन श्रद्धेचा ठेवा आहे. त्यामुळे तिचे संवर्धन आणि जपणूक होणे हे सर्व भाविकांचे सार्वत्रिक आणि सामूहिक उत्तरदायित्व आहे. समाधीवरील अभिषेक हा जरी काही मोजक्या भाविकांच्या श्रद्धेचा विषय असला तरी त्यामुळे होणारी समाधीची झीज तसेच अभिषेकाच्या वेळी मर्यादित लोकांपेक्षा असंख्य भाविकांची होणारी गैरसोय देखील नजरेआड करता येण्याजोगी नाही, असे या ठरावात म्हटले आहे.