नाशिक: तळेगावातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात उफाळलेल्या संतापात एसटीचं सर्वात मोठं नुकसान झालं आहे. 2 ते 3 दिवस चाललेल्या या आंदोलनात तब्बल 19 एसटी बस जाळल्या गेल्या. तर एसटी  सेवा बंद राहिल्यामुळे एसटी महामंडळाला 3 कोटींपेक्षा अधिकचं नुकसान झालं आहे.


सध्या नाशिकमधली परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. शाळा आणि बस सेवा कालपासून सुरळीत सुरु आहे. मात्र, बंद असलेली इंटरनेट सेवा अजून सुरु करण्यात आलेली नाही. उद्यापर्यंत इंटरनेट सेवा सुरु होणार असल्याची माहिती समजते आहे.

महाराष्ट्रात पहिल्यांदाच इंटरनेट सेवा बंद

मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्याची महाराष्ट्रातील ही पहिलीच वेळ होती. यापूर्वी जम्मू-काश्मीर, गुजरातमध्ये इंटरनेट सेवा बंद केली होती. बुरहान वाणीच्या खात्म्यानंतर काश्मीर खोऱ्यात उसळलेल्या दंगलीनंतर काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद होती. तर गुजरातमध्ये हार्दिक पटेलच्या नेतृत्त्वातील पटेल आंदोलदरम्यान इंटरनेट सेवा ठप्प होती.