मुंबई : नाशिकमधील बालकांच्या मृत्यूची तुलना गोरखपूरच्या घटनेसोबत करणं चुकीचं असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवार) व्यक्त केलं. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.


‘नाशिकच्या आणि गोरखपूरच्या घटनेशी तुलना चुकीची आहे. मागील वर्षी किती मृत्यू झाले अशीच तुलना करायला हवी. त्याचेही आकडे आम्ही देऊ. माध्यमांनी ही घटना पुढे आणल्यानंतर आम्ही देखील त्याकडे गांभीर्यानं पाहत आहोत. दरम्यान, याबाबत आवश्यक ती कारवाई केली जाईल. पण या घटनेला गोरखपूरच्या घटनेशी जोडणं चुकीचं आहे.’ असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं.

काय आहे नेमकी घटना?

देशातील सर्वाधिक नवजात अर्भक मृत्यूचं प्रमाण असलेलं रुग्णालय म्हणून नाशिक जिल्हा रुग्णालय बदनाम झालं आहे. गेल्या पाच महिन्यात तब्बल 187 बालकांना प्राण गमवावे लागले आहेत.

देशात नवजात अर्भकांच्या मृत्यूचं प्रमाण दर हजारी 40 असताना नाशिक जिल्हा रुग्णालयात मात्र हे प्रमाण दीडशेवर गेलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे इथल्या अतिदक्षता विभागातील एका इनक्युबेटरमध्ये तीन ते चार बाळांना अक्षरश: दाटीवाटीनं कोंबून ठेवलं जातं.

ज्या अतिदक्षता विभागाची क्षमता 18 बालकं ठेवण्याची आहे, तिथं तब्बल 52 बालकांवर उपचार सुरु आहेत. लाखो रुपये खर्च करुन खाजगी रुग्णालयात मुलांवर उपचार करणं शक्य होत नसल्यामुळे नाइलाजाने चिमुकल्यांना मरणाच्या दारात उभं करावं लागतं.

नाशिक जिल्हा रुग्णालयात 5 महिन्यात 187 बालकांचा मृत्यू झाला. एप्रिल महिन्यात 32, मे महिन्यात 39, जून महिन्यात 25, जुलै महिन्यात 36 तर ऑगस्ट महिन्यात तब्बल 55 बालकं दगावली.

खरंतर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाचा विस्तार करण्यासाठी 21 कोटींचा निधी वर्षभरापासून पडून आहे. मात्र झाडं तोडण्याची परवानगी नसल्यानं काम रखडलं आहे.

VIDEO: 



संबंधित बातम्या :

नाशिक जिल्हा रुग्णालयात पाच महिन्यात 187 अर्भकांचा मृत्यू