मनमाड : फेरीवाल्याकडे कुल्फी खाल्ल्यामुळे 25 ते 30 चिमुरड्यांना विषबाधा झाला आहे. नाशिक मधल्या सटाणा तालुक्यात ही घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे. सुदैवाने सर्व मुलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.


सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने ग्रामीण भागात अनेक फेरीवाले कुल्फी, पेप्सीची विक्री करत असतात. सटाणा तालुक्यातील चिपाई, बैराणे आणि मढ गावातल्या मुलांना कुल्फीतून विषबाधा झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. कुल्फी खाल्ल्यानंतर त्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरु झाला.

त्यामुळे सर्व मुलांना नामपूर इथल्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, सध्या या सर्व मुलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.