Onion : सध्या राज्यातील कांदा (onion) उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारण कांद्याच्या दरात (onion Price)  मोठी घसरण झाली आहे. सध्या नाशिक (nashik) जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली आहे. सततचा अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळं कांदा शेतातच खराब होत आहे. आवक वाढल्यानं मिळेल त्या भावात शेतकऱ्यांना कांदा विकावा लागत आहे. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे.


चाळीतच कांदा खराब होण्याची भीती


दरम्यान, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार (Dr Bharti Pawar) यांनी नाफेडने कांदा खरेदी करण्याची मागणी केली होती. पण त्याचा निर्णय अद्याप न झाल्यानं चाळीतच कांदा खराब होण्याची भीती आहे. वास्तविक उन्हाळी कांदा हे साठवणुकीचे पीक आहे. तरीही जवळपास सर्वच बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्यानं मिळेल त्या भावात शेतकऱ्यांना कांदा विकावा लागत आहे. 


राज्यमंत्री भारती पवार यांचे वाणिज्य मंत्री पियूष गोयलांना निवेदन  


अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं कांद्याचं मोठं नुकसान झालं आहे. या स्थितित कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांनी पुढाकार घेतला होता. नाफेडमार्फत (Nafed) तात्काळ कांद्याची खरेदी करण्यात यावी, अशी मागणी डॉ. भारती पवार यांनी वाणिज्य मंत्री पियूष गोयल (Minister Piyush Goyal ) यांच्याकडे केली होती. याबाबत त्यांनी गोयल यांना निवेदनही दिलं होतं. कांदा उत्पादनाच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. भारतात होणाऱ्या कांदा उत्पादनापैकी जवळपास 30 टक्के कांदा महाराष्ट्रात पिकतो. मात्र, मागील काही महिन्यापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असल्याचे मत भारती पवार यांनी व्यक्त केले. सद्यस्थितीत कांद्याच्या पडलेल्या किंमती विचारात घेता नाफेडमार्फत कांदा खरेदी प्रक्रिया तात्काळ राबवण्यात यावी, अशी मागणी डॉ. भारती पवार यांनी मंत्री गोयल यांच्याकडे केली होती. त्यांच्या या मागणीवर सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही.


नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस


गेल्या काही दिवसापासून नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळं मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान होत आहे. याचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसलाय. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा कांदा खराब झाला आहे. सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक वाढली आहे. त्यामुळं दरांवर परिणाम झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय.  


महत्त्वाच्या बातम्या: