मुंबई/नाशिक : नाशकातील साठेबाज कांदा व्यापाऱ्यांनी दुबई हवालामार्फत 'काळ्याचं पांढरं' केल्याचा संशय निर्माण झाला आहे. दुबईतून कांदा निर्यातीच्या नावाखाली फक्त पैसे आणले गेले, कांदे निर्यात झालेच नसल्याचा संशय ईडीला आहे.


तीन टक्के व्याजदरानं पैसे देण्याचा उद्योगही काही जण करत असल्याचं तपासात उघड झालं आहे. नाशकातील सात बड्या व्यापाऱ्यांनी कांद्याची साठेबाजी करत कृत्रिम टंचाई निर्माण केल्याचा आरोप आहे.

प्रशासनाच्या तंबीनंतर कांदा व्यापाऱ्यांनी उद्यापासून पुन्हा व्यवहार सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आयकरच्या धाडींविरोधात गेल्या तीन दिवसांपासून कांदा बाजार बंद होते.

नाशिक शहर आणि जिल्ह्यात कांद्याच्या व्यापाऱ्यांवर छापेमारी सुरु झाली आणि त्याचा इफेक्ट लगेच दिसायला लागला. कांद्याचे घाऊक बाजारातील दर तब्बल 35 टक्क्यांनी घसरले. नाशिक जिल्ह्यात 20 अधिकाऱ्यांच्या पथकाकडून 7 व्यापारी, 25 घरं, गोदामं आणि कार्यालयाची झाडाझडती करण्यात आली.

साठेमारी करुन कांद्याचे दर वाढवणाऱ्या व्यापाऱ्यांना वेसण घालण्यासाठी ही कारवाई केल्याची माहिती आहे. या
छापेमारीमुळे व्यापाऱ्यांचं धाबं दणाणलं. नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव ठप्प झाले.

गेल्या काही दिवसात मुंबईत कांद्यानं तिशी गाठली. पण शेतकऱ्यांना फक्त 15 रुपयांचा दर मिळायचा. मधलं कमिशन व्यापारी लाटायचे. साठेमारी करुन कांद्याचे दर वाढवण्यात व्यापाऱ्यांचा हात असल्याचा आरोप आहे.