'शेतकरी आत्महत्या नाही, आता बँक संचालकांचे खून होतील'
एबीपी माझा वेब टीम | 12 Apr 2017 01:23 PM (IST)
नाशिक : नाशिक जिल्हा बँकेने खाती गोठवलेल्या शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. यापुढे शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, तर बॅंकेच्या संचालकांचे खून होतील, असा इशाराही संतप्त शेतकऱ्यांनी बँकेला दिला आहे. ज्या शेतकऱ्यांची खाती गोठवण्यात आली आहेत, त्यावरुन बुधवारच्या बैठकीत संचालक आणि शेतकरी यांच्यात जबर बाचाबाची झाली. बॅंकखाती लवकरात लवकर मोकळी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. चेअरमन बैठकीला अनुपस्थित असल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. येत्या दोन दिवसात हा निर्णय मागे न घेतल्यास 25 तारखेला बॅंकेला घेराव घालणार, बॅंकेला कुलूप ठोकणार, संचालकांना पायरीही चढू देणार नाही, तसंच यापुढे शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, तर बॅंकेच्या संचालकांचे खून होतील, असा इशाराही बँकेला दिला गेला आहे. नाशिक जिल्हा बँकेनं तब्बल 1075 कार्यकारी सोसायट्यांचा कर्जपुरवठा अचानकपणे थांबवला आहे. या निर्णयामागील कोणतंही कारण अद्याप बँकेकडून आलेलं नाही. जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेत सोसायटी अध्यक्षांनी ठिय्या आंदोलन सुरु केलं. विविध कार्यकारी सोसायट्यांचे तीन लाख सभासद असून त्यांचा कर्ज पुरवठा थांबला आहे. खात्यात पैसे असूनही कर्ज न भरणाऱ्या 60 हजार सभासदांच्या खात्यावरील व्यवहारही थांबवण्यात आले आहेत.