मुंबई/नाशिक : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या कथित वसुलीचे गंभीर आरोप झाल्यानंतर आता परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह परिवहन विभागातील अधिकाऱ्यांवरही भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. परिवहन मंत्री अनिल परब आणि आरटीओमधील वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात नाशिकमधील पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी ही तक्रार दाखल केली आहे. आरटीओ खात्यात पदोन्नतीसाठी आणि इतर व्यवहारात भ्रष्टाचार होतो असा आरोप त्यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. अधिकाऱ्यांच्या मदतीने 300 कोटी रुपयांचा ट्रान्सफर पोस्टिंग घोटाळा केल्याचा या तक्रारीत म्हटलं आहे.


या प्रकरणी पोलिसांकडून चौकशीला सुरुवात झाली आहे. पोलीस उपायुक्त (क्राईम ब्रांच) आणि इतर दोन उपायुक्त या प्रकरणाची चौकशी करत आहेत. पाच दिवसात चौकशी पूर्ण करण्याचे आदेश पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिले आहेत. दरम्यान गजेंद्र पाटील अद्याप चौकशीसाठी हजर झालेले नाहीत. ते 31 मे नंतर हजर राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.


अनिल परब यांनी पायउतार व्हावं : संदीप देशपांडे
यासंदर्भात परिवहन मंत्री अनिल परब यांनी आपल्या पदापासून पायउतार होऊन या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी केली आहे.






 


छगन भुजबळ यांच्याकडून पाठराखण
दरम्यान राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अनिल परब यांची पाठराखण केली आहे. खालच्या स्तरावर काय होते याला मंत्री जबाबदार कसे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसंच "हे प्रकार चालूच राहणार, गुन्हा दाखल करायचा, नाहीतर कोर्टात जायचं हा जुना खेळ आहे. हे विरोधी पक्षाचं षडयंत्र आहे," असंही भुजबळ म्हणाले.