नाशिक : आंब्याच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याप्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर नाशिक न्यायालयात तक्रार दाखल झाली आहे. पीसीपीएनडीटी समितीनं भिडे यांना दोषी ठरवलं होतं. त्यानंतर नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून भिडे यांच्या विरोधात न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे.


नाशिक महापालिकेच्या प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान चाचणी समितीच्या चौकशीत भिडे दोषी आढळले आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने समिती स्थापन करुन, संबंधित प्रकरणाची चौकशी केली होती.


दरम्यान, काही दिवसांपूर्वी नाशिक महापालिकेने संभाजी भिडेंना या प्रकरणात नोटीसही पाठवली होती. मात्र भिडेंनी नाशिक महापालिकेने पाठवेलली नोटीस स्वीकारली नव्हती. त्यावेळीच संभाजी भिडे यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार हे निश्चित झालं होतं.


काय होतं संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य?


माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते," असं अजब दावा श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं आहे. नाशिकमध्ये झालेल्या एका सभेत त्यांनी हे विधान केलं.


भिडेंनी सभेत शिवकालीन इतिहासाचे दाखले देत सध्याची सामाजिक, राजकीय व्यवस्थेवर जोरदार प्रहार केलेच, पण आपल्या शेतातील आंब्याचे दाखलेही दिले. हे आंबे खाल्ल्याने जवळपास 150 जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाल्याचा दावा त्यांनी केला.


संभाजी भिडे म्हणाले की, "भगवंताची कृपा आहे ही मला एक कोय मिळाली. त्या कोईचं रोपटं करुन आता त्याचं झाडं झालं. ते आंब्याचं झाड माझ्याकडे आहे. त्याची काय मजा आहे, ते सांगतो तुम्हाला. अहो, लग्न होऊन 8-8, 10-10, 12-12 वर्ष झालेल्यांना सुद्धा पोर होत नाही, अशा स्त्री-पुरुषांनी, पती पत्नींनी ती फळं खाल्ली, तर निश्चित पोर होईल. असं झाड आहे माझ्याकडे. रोज आंबे आणून, माझ्याही बागेत, शेतात ते लावले. मी आता तुम्हाला सोडलं तर माझ्या आईशिवाय कोणाला सांगितलं नाही, ते आंबे कसे आहेत. मी आतापर्यंत 180 पेक्षा जास्त जणांना, पती-पत्नींना, जोडप्यांना खायला दिलेत. ती पद्धत शिकवली, पथ्य सांगितलं आणि 150 पेक्षा जास्त जणांना मुलं झाली. ज्यांना मुलगा हवा असेल, त्यांना मुलगाच होईल. अपत्य नसेल तर होते. असा हा आंबा आहे. म्हणजे त्याचा अर्थ नपुंसकत्वावर तोडगा आणि वंध्यत्वावरचा ताकद देणारा तो आंबा आहे."