नाशिक : राज्यात थंडीचा कडाका आता चांगलाच वाढतोय. उत्तर, मध्य महाराष्ट्रात हाडं गोठवणाऱ्या थंडीनं नागरिक रस्त्यावर  शेकाटीची ऊब घेत आहेत. पहाटे किमान तापमानात घट होत दाट धुक्याची चादर पसरली आहे. मुंबईसह नाशिक, पुणे, जिल्ह्यात तापमान घसरले आहे. नाशिक शहराचे चार दिवसांपासून तापमान ८ ते ८.५ अंशांवरती आहे. थंडीचा कडाका वाढत असल्याने नाशकातील मनपा हद्दीतील  शाळा उशिरा भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका शिक्षण विभागाने वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलंय.(Nashik Weather)

Continues below advertisement

नाशिकमध्ये वाढत्या थंडीमुळे महानगरपालिकेच्या सकाळ सत्राच्या शाळा आठ वाजता भरणार आहेत. चार दिवसांपासून शहराचे तापमान ८ ते ८.५ अंशांवरती आहे, थंडीमुळे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. खाजगी शाळा व्यवस्थापनावर सक्ती नाही असेही सांगण्यात आले आहे, खाजगी शाळेचे निर्णय संबंधित खाजगी शाळा व्यवस्थापनाला घेण्याची मुभा देण्यात आलेली आहे. नाशिकमध्ये वाढत्या थंडीमुळे सकाळी सात वाजताची शाळा आता आठ वाजता भरणार आहे, लहान मुलांच्या आरोग्यासाठी मनपा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पालकांच्या मागणीनंतर मनपा प्रशासनाने सकाळी सातची वेळ आठ वाजता केल्याची माहिती आहे. थंडीमुळे मनपाच्या शाळा उशीर भरवण्याचा निर्णय घेतला आहे, तर खाजगी शाळांना स्वतंत्र निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली आहे.

Nashil Cold: निफामध्ये पारा 6.1 अंशावर

नाशिकच्या निफामध्ये पारा 6.1 अंशावर गेला आहे. तर, नाशिकमध्ये देखील तापमान 8 अंशापर्यंत घसरल्याने थंडीत मोठी वाढ झाली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तापमानात घट होत आहे. पुढचे दोन-तीन दिवस थंडी कायम राहण्याची शक्यता आहे. थंडीपासून बचावासाठी नागरिक उबदार कपड्यांचा वापर करत आहेत. 

Continues below advertisement

पुढील 2 दिवसांत सरासरी सामान्य तापमानापेक्षा कमी तापमान असणार आहे. उत्तरेकडील थंड वारे वेगाने वाहत असल्याने पुढील ४८ तासात महाराष्ट्रात थंडी वाढणार आहे. त्यामुळे हवामान विभागाने १४ जिल्ह्याना येलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. 

Weather Update: थंडीचा परिणाम कोणत्या जिल्ह्यावर होणार

मराठवाडा: जालना, परभणी, बीड, नांदेड आणि लातूर 

विदर्भ: गोंदिया, नागपूर

उत्तर महाराष्ट्र: नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर 

पश्चिम महाराष्ट्र: पुणे, सोलापूर 

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ तसेच शेजारील छत्तीसगड, पश्चिम मध्य प्रदेश आणि तेलंगणा या प्रदेशांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा जोर वाढल्याने राज्यभर गारठ्याची तीव्रता जाणवत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील तापमान ५ अंशांपर्यंत खाली आले असून, विदर्भात ७ ते ८ अंशांची नोंद होत आहे. त्यामुळे या भागांमध्ये पुढील काही दिवस शीतलहरी कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, जळगाव, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, वर्धा, नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. धुळे, निफाड आणि अहमदनगरच्या काही भागांत तापमान ४ अंशांपर्यंत कोसळले आहे. रात्रीच्या वेळी वाढलेल्या थंडीमुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे कमी केले आहे. उत्तरेकडील थंड लहरी कायम राहिल्याने पुढील काही आठवड्यांत थंडी आणखी वाढू शकते. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, ला निनोच्या प्रभावामुळे डिसेंबर आणि जानेवारी हे दोन्ही महिने राज्यासाठी सर्वाधिक थंड ठरण्याची शक्यता आहे.