शिर्डी : ‘सबका मालिक एक’ असा संदेश जगाला देणाऱ्या साईबाबांच्या समाधीला 100 वर्षे पूर्ण झाले असून, आज उत्सवाचा मुख्य दिवस आहे. 15 ऑक्टोबर 1918 रोजी दसऱ्याच्या दिवशीच साईबाबांनी समाधी घेतली. या निमित्ताने शिर्डीत हजारो साईभक्त दाखल झालेत.


साईबाबांची जीवनशैली अत्यंत साधी-सरळ होती. पाच घरी भिक्षा मागून जे मिळेल, ते आधी पशु-पक्ष्यांना आणि भुकेलेल्यांना वाटून देत, नंतरच स्वत: अन्नग्रहण करत असत. आजही साईबाबा संस्थान बाबांच्या भिक्षा झोळीची परंपरा अविरतपणे सुरु ठेवलीय. साईंच्या आगमनाआधी महिला रांगोळीने रस्ता सजवतात, तर निषाणाची आरती करुन हळद-कुंकू वाहून भिक्षेकऱ्यांचं स्वागत केलं जातं.

देशभरातून आलेले साईभक्त, ग्रामस्थही मोठ्या प्रमाणात सामील होऊन, दारोदार फिरुन भिक्षा गोळा करतात. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांसह विश्वस्त भिक्षा झोळीत सहभागी झाले होते. आपल्या दारात भिक्षा मागण्यासाठी आजही साईबाबा भिक्षेकऱ्यांच्या रुपात येतात, अशी श्रद्धा ठेऊन ग्रामस्थ साईच्या झोळीत भरभरुन दान देतात. पैसे, गहू, बाजरी, ज्वारी अशा विविध स्वरुपात ही भिक्षा दिली जाते. साईबाबा संस्थानला हजारो क्विंटल धान्य भाविक दान करतात आणि हेच धान्य प्रसादभोजनासाठी वर्षभर वापरल जातं.