Nashik Lok Sabha Constituency : एकीकडे नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) शिवसेना ठाकरे गटाने (Shivsena UBT) सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राजाभाऊ वाजे यांच्याकडून नाशिकमध्ये जोरदार प्रचारही केला जात आहे. तर दुसरीकडे महायुतीत (Mahayuti) मात्र नाशिकच्या जागेचा तिढा अद्याप कायम आहे. 


नाशिकसाठी महायुतीकडून जोरदार रस्सीखेच सुरु असताना शिवसेनेच्या हेमंत गोडसेंची (Hemant Godse) उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर दुसरीकडे नाशिकच्या जागेसाठी महायुतीकडूनच इच्छुक असणाऱ्या शांतीगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आपली ताकद काय आहे हे सांगत एकप्रकारे महायुतीच्या नेत्यांनाच इशारा दिला आहे. बाबाजी भक्तपरिवाराकडून शांतीगिरी महाराजांची ताकद काय आहे? याबाबत एक पत्रक प्रसारमाध्यमांना जारी करण्यात आले आहे. 


काय म्हटलंय पत्रकात?



  • 1 लाख 80 हजार कुटुंबांच्या भक्तपरिवाराचे सुमारे 4 लाख फिक्स मतदान.

  • जळगाव, धुळे, नंदुरबार, सटाणा, कळवण, मालेगाव, निफाड, चांदवड, नगर, संभाजीनगर यासारख्या अनेक भागातील भक्त परिवाराचे नाशिक मधील नातेवाईकांचे मतदान.

  • जातीय समीकरण मोडून काढण्याची ताकद असलेला 18 पगड जाती आणि बारा बलुतेदारांचा जय बाबाजी भक्तपरिवार.

  • शांतीगिरी महाराज यांची स्वच्छ प्रतिमा.

  • खिसे नसलेलं, निस्वार्थ, निष्काम असं ब्रम्हचारी व्यक्तिमहत्व.

  • 7 लोकसभा मतदारसंघात असेलला मोठा प्रभाव.

  • 16 विधानसभा मतदारसंघात निर्णायक भूमिका.

  • सर्वपक्षीय मोठ्या नेत्यांसोबत असलेले जिव्हाळ्याचे संबंध.

  • नाशिकसाठी निधी खेचून आणण्याची ताकद.

  • अंतर्गत कलहामुळे अनेक पक्षांचे लोकं आतून शांतीगिरी महाराज यांचे काम करण्याची शक्यता.

  • अंजनेरी, कुंभमेळा व इतर धार्मिक मुद्यांवर असलेला प्रभाव.


शांतीगिरी महाराजांकडून नाशिकमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन


दरम्यान, शांतीगिरी महाराज हे नाशिक लोकसभेसाठी महायुतीकडून (Mahayuti) निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र महायुतीकडून तिकीट मिळाले नाही तर ते अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. यासाठी शांतीगिरी महाराजांनी आठ दिवसांचे अनुष्ठानदेखील केले आहे. या अनुष्ठानाची सांगता काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वरमध्ये (Trimbakeshwar) करण्यात आली. शांतीगिरी महाराजांनी त्र्यंबकेश्वरमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केलं होते. या शक्तीप्रदर्शनात  'आता लढायचं आणि जिंकायचं', 'खूप केलं नेत्यांसाठी यंदा लढू बाबांसाठी' अशा आशयाचे फलक बघायला मिळाले होते. या फलकाची नाशिकमध्ये मोठी चर्चाही रंगली होती. त्यानंतर नाशिकमध्ये शांतीगिरी महाराजांकडून जंगी बाईक रॅली काढण्यात आली होती. या वेळी शांतीगिरी महाराजांनी महायुतीने माझा विचार केल्यास माझा विजय नक्की होणार, असे वक्तव्य केले होते.


आणखी वाचा 


Nashik Lok Sabha Election: ठाण्यात मध्यरात्रीच्या सुमारास एकनाथ शिंदेंची गोडसे अन् बोरस्तेंशी गुप्त खलबतं, नाशिकचा तिढा आज सुटण्याची शक्यता