Satyajeet Tambe nashik graduate constituency election  : नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबे यांनी विजयश्री खेचून आणत तांबे कुटुंबाचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. सत्यजीत यांच्या विजयला जसे अनेक कंगोरे आहेत तसेच अनेक प्रश्न ही उपस्थित होत आहेत. काँग्रेसच्या अंतर्गत वादात शिवसेना ठाकरे गटाने मारलेली उडी. पाठिंबा देण्याची इच्छा असूनही खुलेपणाने भाजप प्रत्यक्ष मतदानापासून दूर राहिली. बाळासाहेब थोरातांचे मौन आणि पुढील वाटचालीच्या चर्चा या साऱ्या गोष्टी यात दडल्यात. या सगळ्यांची टप्याटप्याने त्याची उकल होणार आहे.

 

सत्यजीत सुधीर तांबे... महाराष्ट्राचं विधिमंडळाच्या जेष्ठ सभागृहाला लाभलेला एक तरुण, उत्कृष्ट संघटन कौशल्य, सामाजिक जाण  असणारा अभ्यासू आमदार. काँग्रेस विचारांच्या जडणघडणीत वाढलेल्या सत्यजीत तांबे यांचा राजकीय प्रवास 22 वर्षांचा असला तरी एखाद्या मुरब्बी राजकीय नेत्या प्रमाणे त्यांची वाटचाल आहे.. कुठे किती बोलायचे. कुठे संयम दाखवायचा याचे धडे त्यांना वडील सुधीर तांबे आणि मामा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून मिळाले आहे. म्हणूनच त्यांच्या बंडखोरीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. 68 हजार 999 मत मिळवणारे सत्यजीत तांबे 29 हजार 465 मताधिक्याने विजयी झाले. 

 

39 हजार 534 मते मिळविणाऱ्या शिवसेना ठाकरे गट पुरस्कृत महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांचा त्यांनी पराभव केला. सत्यजित आपली भूमिका चार तारखेला स्पष्ट करणार आहेत. पण काँग्रेसच्या अंतर्गत भांडणात ठाकरे गटाने पडण्याची गरज होती का..? जो मतदारसंघ आधी भाजप आणि नंतर काँग्रेस विचारसरणीच्या डॉ सुधीर तांबे यांच्या नांवाने ओळखला जातो. तिथे ठाकरे गटाचा निभाव लागणार कि नाही याचा विचार ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला असता तर एका पराभव पचवण्याची नामुष्की ठाकरे गटावर आली नसती. उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिल्यानंतरही महाविकास आघाडीचे शुभांगी पाटील यांच्या नावावर एकमत होण्यासाठी झालेला विलंब, प्रचारला मिळालेला कमी कालावधी, काँग्रेसचे बहुसंख्य नेते पदाधिकारी शुंभागी पाटील यांच्या महाविकास आघाडीच्या मेळाव्याला उपस्थित राहायचे आणि नंतर सत्यजित तांबे यांचे उघड उघड काम करायचे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची अवस्थाही यापेक्षा वेगळी नव्हती. 

 

असे एक ना अनेक कारण शुभांगी पाटील यांच्या पराभवाची सांगता येतील. पहिल्या दिवसापासून सत्यजित तांबे यांनी राजकीय भाष्य केले नसले तरी देखील आपला स्वतःचा फोकस आणि माध्यमांचा आपल्यावरील फोकस कमी होऊ दिला नाही. राजकीय स्पसेन्स आजही कायम ठेवला असून 4 फेब्रुवारीला काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

 

सत्यजीत तांबे यांच्या विजयात भाजपचा हातभार असला तरीही जाहीरपणे पाठिंबा देता आला नाही ते कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.. तांबे कटुबीयांना दोन एबी फॉर्म दिले होते. तरीही त्यांनी पक्षाला फसविले अशी गजर्ना करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज नाशिकच्या  निवडणुकीत खलनायक ठरलेत. शरद पवार यांच्या पाठोपाठ विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही सत्यजीत विजयी होतील असे सूचक केलेलं वक्तव्य महाविकास आघाडीत काही आलबेल नाही . नाना पटोले यांचा निर्णय योग्य नसल्याचेच निदर्शक आहे.

 

"या निवडणुकीच्या मैदानापासून दूर मुबंईत उपचार घेणारे बाळासाहेब थोरात हेही या निवडणुकीच्या केंद्रस्थानी होते. काँग्रेसच्या ज्या नेत्यांना बाळासाहेब स्पर्धक वाटतात त्यांनी बाळासाहेबांना लक्ष करणायचा शेवट पर्यंत प्रयत्न केला.  राजकीय भूमिका काय मांडायची हा प्रश्न थोरताना सुरवातीपासूनच होता. भाच्याची बाजू घ्यायची कि महाविकास आघाडीने पुरस्कृत केलेल्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहायचे हा प्रश्न त्यांना विचारला जाणार असल्याने त्यांनी मौन बाळगणेच पसंत केले. त्यातच गेल्या काही दिवसापासून बाळासाहेब थोरात राजकीय संन्यास घेण्याच्या आणि त्यांची मुलगी जयश्री थोरात त्यांचा राजकीय वारसा पुढे घेऊन जाणार असल्याच्या चर्चा सातत्याने रंगू लागल्या आहेत."

 

काँग्रेसमधून भाजपात आलेले आणि आपले चांगले बस्तान बसवणार राधाकृष्ण विखे पाटील यांनी तांबेंना पाठिंबा तर दिला, मात्र बाळासाहेब थोरात यांना डिवचण्याची एकही संधी सोडत नाही. त्यामुळे सत्यजित यांनी भाजपत प्रवेश करावा, थोरातांची आपली भूमिका स्पष्ट करावी अशी आग्रही मागणी करत तांबे-थोरातांना कोंडीत पडकण्याचा प्रयत्न केला. सत्यजीत यांना उघड उघड समर्थन देण्यात भाजपमध्येही दोन मतप्रवाह होते, शिवाय भाजपने समर्थन दिलं असते,  इतर पुरोगामी संघटना सत्यजीतच्या मागे उभे राहिल्या असत्या का हा ही प्रश्न निर्माण झाला असता.

 

अशा अनेक घडामोडी घडवणारी नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणुक पार पडली आहे. सत्यजीत तांबे यांची पुढची भूमिका काय हे अद्याप स्पष्ट नाही. आधी निलंबन केले आणि आता विजय झाल्यानंतर काँग्रेसने त्यांना पक्षात सन्मानाने  घेण्याचा निर्णय घेतला तरी सत्यजित जाणार का? सत्यजित काँग्रेसमध्ये गेले तर त्यांच्या विजयात मोठा वाटा उचलणाऱ्या भाजपची भूमिका काय राहणार हा पेच कायम असल्यानं वेट अँड वॉचची भूमिका स्वीकारून काही कालावधीसाठी अपक्षच राहणे सत्यजीत तांबे पसंत करणार का हे बघणं महत्वाचे आहे.